Kartik Aaryan: कधीकाळी ट्रेनच्या तिकिटासाठी नव्हते पैसे, आता कोट्यवधींची कमाई करतोय कार्तिक आर्यन
Kartik Aaryan Birthday: कार्तिकने आपल्या चित्रपटात काम करावे, यासाठी अनेक निर्माते आता वाट पाहत आहेत. मात्र, एक काळ असा होता जेव्हा ऑडिशनसाठी आलेल्या कार्तिकला निर्माते स्टुडिओ बाहेरच नकार कळवायचे.
Kartik Aaryan: लाखो तरुणींच्या हृदयाची धडधड बनलेला अभिनेता कार्तिक आर्यन याचा आज वाढदिवस आहे. ‘भूल भुलैय्या २’च्या यशानंतर कार्तिक आर्यनचा बॉलिवूडमधील दबदबाही चांगलाच वाढला आहे. आजघडीला कार्तिक आर्यनकडे अनेक चित्रपटांच्या रांगा लागल्या आहेत. कार्तिकने आपल्या चित्रपटात काम करावे, यासाठी अनेक निर्माते वाट पाहत आहेत. मात्र, एक काळ असा होता जेव्हा ऑडिशनसाठी आलेल्या कार्तिकला निर्माते स्टुडिओ बाहेरच नकार कळवायचे. या काळात स्ट्रगल करणाऱ्या कार्तिककडे अक्षरशः स्टुडिओपर्यंत प्रवास करण्यासाठीचे पैसे देखील नव्हते.
ट्रेंडिंग न्यूज
अभिनेता कार्तिक आर्यन मूळचा ग्वालियारचा. मध्य प्रदेशातील ग्वालियारमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात २२ नोव्हेंबर १९९० रोजी कार्तिकचा जन्म झाला. बालपणापासूनच कार्तिकचा अभिनयाकडे ओढा होता. मात्र, ही गोष्ट त्याने घरातल्यांपासून नेहमीच लपवून ठेवली. अभिनयविश्वात काम करण्यासाठी कार्तिकने मुंबई गाठली. पण, या गोष्टी घरातल्यांपासून लपवण्यासाठी त्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. कॉलेजमध्ये असतानाच त्याने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली होती.
इंजिनिअरिंग करत असतानाच कार्तिक अनेक ठिकाणी ऑडिशन देत होता. कार्तिकचं कॉलेज नवी मुंबईत होतं. याच्या जवळपासच तो एका शेअरिंग रूममध्ये राहत होता. या छोट्याशा घरात तब्बल १२ लोकांसोबत तो राहत होता. या ठिकाणाहून सतत मुंबईला येण्यासाठी त्याच्या खिशात फारसे पैसे देखील नव्हते. अशावेळी कार्तिक नवी मुंबई ते मुंबई हा लोकल प्रवास विना तिकीट करायचा. ट्रेनचं तिकीट देखील त्यावेळी त्याला खूप महाग वाटत होतं. दररोजची पायपीट करून तो स्टुडिओंमध्ये जात होता. मात्र, सतत तीन वर्ष त्याच्या पदरी निराशाच पडली.
मात्र, तीन वर्षांनी त्याच्या हातात ‘प्यार का पंचनामा’ हा चित्रपट आला. या चित्रपटातील दमदार अभिनयामुळे त्याच्यासाठी चित्रपटसृष्टीची कवाडं खुली झाली. यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. कार्तिकने केलेला प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. प्रचंड संघर्ष आणि मेहनतीच्या जोरावर कार्तिकने आज हा यशाचा टप्पा गाठला आहे.