Narendra Modi on Agniveer : कारगिल विजय दिनाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज द्रास येथील युद्ध स्मारकासमोर नतमस्तक होत कारगिल युद्धातील शहिदांना आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी अग्निवीर योजनेचं जोरदार समर्थन केलं. 'ही योजना म्हणजे भारतीय लष्करानं केलेल्या आवश्यक सुधारणांचं हे एक उदाहरण आहे. राजकारण्यांना सलाम करणं, परेड करणं एवढंच सैन्याचं काम आहे असं काही लोकांना वाटतं, पण आमच्यासाठी लष्कर म्हणजे १४० कोटी देशवासीयांचा विश्वास आहे. भारतीय लष्कराला अधिकाधिक तरुण बनविणं, लष्कराला युद्धासाठी सतत फिट ठेवणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. या योजनेमुळं देशाची ताकद वाढेल. दुर्दैवानं काही लोकांनी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अशा संवेदनशील विषयावर राजकारण सुरू केलं आहे. हजारो कोटींचे घोटाळे करून आपल्या लष्कराला कमकुवत करणारेच लोक विरोध करणाऱ्यांमध्ये आहेत, असं मोदी म्हणाले.