Ajit Pawar vs Sharad Pawar : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाची कार्यकारिणी बैठक झाली. या बैठकीला संबोधित करताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा मागील आठवणींना उजाळा दिला. महायुतीत आपल्या पक्षाचं काहीही नुकसान होणार नाही. आपल्याल योग्य तो मानसन्मान आणि सत्तेत पुरेसा वाटा मिळेल, अशी ग्वाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. २००४ साली आमच्या पक्षात नवखे लोक होते म्हणून आम्ही काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं असं शरद पवार एका मुलाखतीत म्हणाले होते. त्यावरही अजित पवार यांनी भाष्य केलं. पवार साहेब आता काहीही सांगतायत. खरंतर, आपलं कुणी ऐकणार नाही या संशयातून त्यांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नाही असा दावा अजित पवार यांनी केला. तेव्हा मुख्यमंत्री पद घेतलं असतं तर राज्यात कायम राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री राहिला असता, असंही ते म्हणाले.