Jitendra Awhad Video : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान महाराष्ट्रात सुरू झालं आहे. देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघातही आजच मतदान होत आहे. त्याचबरोबर इथं आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. मतदानाआधी मतदारांना आकर्षित करण्यासाठी अजित पवार लालूच दाखवत असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी सोमेश्वर साखर कारखान्यानं ऊसाचा भाव वाढवला असून वाढीव पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. पराभवाच्या भीतीपोटी अजित पवारांकडून मतदारांना लालूच दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे द्यायला आमचा विरोध नाही मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे का जमा केले?, असा सवाल आव्हाड यांनी केला. भ्रष्ट मानसिकतेचा माणूस काय करू शकतो हेच अजित पवारांनी दाखवून दिलंय, अशी सडकून टीका आव्हाड यांनी केलीय.