Virat Kohli: बाबर आझमचं ‘ते’ ट्वीट… आणि विराटच्या बॅटमधून पडू लागला धावांचा पाऊस, पाहा
Virat Kohli-Babar Azam: विराट कोहलीने अखेर आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७१ वे शतक झळकावले आहे. तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे शतक आले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने काही दिवसांपूर्वी विराट कोहलीच्या समर्थनार्थ ट्विट केले होते, त्या ट्विटनंतर विराट कोहलीची कामगिरी बहरली आहे.
विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध बहुप्रतिक्षित ७१ वं आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. गेल्या तीन वर्षापासून क्रिकेट चाहते या शतकाची प्रतिक्षा करत होते. कोहलीने आफगाणिस्तानविरुद्ध त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७१ वे शतक झळकावले आहे. कोहलीने ५३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. दुबईत झालेल्या आशिया चषकाच्या सुपर-४ फेरीच्या सामन्यात कोहलीने हे शतक पूर्ण केले.
आशिया चषक २०२२ मध्ये विराट कोहली आपल्या जुन्या रंगात दिसला आहे. आशिया चषकापूर्वी तो एक महिनाभर ब्रेकवर होता. विराट कोहली वाईट काळातून जात असताना क्रिकेट जगतातून अनेकांनी त्याच्यावर टीका केली. मात्र, अशा परिस्थितीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा विराट कोहलीच्या पाठिशी उभा राहिला. बाबरने विराच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. ते आता विराटच्या ७१ व्या शतकानंतर पुन्हा चर्चेत आले आहे.
कोहलीच्या समर्थनार्थ बाबर आझमने १५ जुलै रोजी ट्विट केले होते. बाबरने ट्वीटमध्ये विराट कोहलीसोबतचा फोटो शेअर केला होता आणि लिहिले की, “ही वेळही निघून जाईल, खंबीर राहा”.
१५ जुलै २०२२ रोजी केलेल्या या ट्विटनंतर विराट कोहलीने ६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये विराटने जबरदस्त कामगिरी केली. विराटने ६ सामन्यात ७० च्या सरासरीने २९३ धावा केल्या आहेत.
१५ जुलै २०२२ नंतर विराट कोहलीची कामगिरी
एकूण सामने - ६,
एकूण डाव - ६
धावा - २९३
सरासरी - ७३.२५
सर्वोच्च धावसंख्या - १२२*
शतक - १, अर्धशतके - २
संबंधित बातम्या