Viral Video: रिषभ पंतच्या 'त्या' कृत्यानं रोहित शर्मा संतापला, मैदानावरच सुनावलं
IND vs WI 4th T20I: भारतीय संघाने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. फ्लोरिडामध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या T20 सामन्यात भारताने विंडीज संघाचा ५९ धावांनी पराभव केला. या सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्मा हा यष्टीरक्षक रिषभ पंतवर नाराज होताना दिसला.
भारतीय संघाने शनिवारी मालिकेतील चौथ्या T20 सामन्यात (IND vs WI 4th T20I) वेस्ट इंडिजचा ५९ धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने ५ सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
फ्लोरिडामध्ये झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने ५ विकेट गमावून १९१ धावा केल्या होत्या. यानंतर विंडीजचा संघ १९.१ षटकांत सर्वबाद १३२ धावांवर ऑलाऊट झाला. मात्र, या सामन्यात रोहित शर्मा यष्टीरक्षक रिषभ पंतवर नाराज झालेला दिसला.
नेमकं काय घडलं?
ही घटना वेस्ट इंडिजच्या डावाच्या पाचव्या षटकात घडली. वेस्ट इंडिजसमोर १९२ धावांचे कठीण लक्ष्य होते. अक्षर पटेलच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर विंडीज संघाचा कर्णधार निकोलस पूरन याने एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काइल मेयर्स धावा घेण्याच्या मन:स्थितीत नव्हता.
त्यामुळे अर्ध्या पीचमध्ये आलेल्या पूरनला परतायला वेळ मिळाला नाही. अशा स्थितीत भारतीय खेळाडूंना त्याला धावबाद करण्याची संधी मिळाली. संजू सॅमसनने चेंडू पकडून विकेटकीपर पंतकडे फेकला. मात्र, पंत हातात चेंडू हातात घेऊन स्टंपजवळ उभा राहिला. बेल्स उडवायला त्याने थोडा वेळ घेतला. हे पाहून रोहित त्याच्याजवळ आला आणि रागाच्या भरात काहीतरी बोलताना दिसला. त्यानंतर पंतने बेल्स उडवून फलंदाजाला धावबाद केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान, भारताकडून युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने ३ तर आवेश खानने २ बळी घेतले. सामनावीर म्हणून अवेशची निवड करण्यात आली.
तत्पूर्वी, फलंदाजीत भारताकडून यष्टिरक्षक रिषभ पंतने सर्वाधिक ४४ धावांचे योगदान दिले. त्याने ३१ चेंडूत ६ चौकार मारले. कर्णधार रोहित शर्माने १६ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३३ धावा केल्या. तर संजू सॅमसन २३ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार मारत ३० धावांवर नाबाद परतला.