मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma: वर्ल्डकपआधी कॅप्टन रोहितला शोधावी लागणार या ४ प्रश्नांची उत्तरे, आता फक्त ५ चान्स

Rohit Sharma: वर्ल्डकपआधी कॅप्टन रोहितला शोधावी लागणार या ४ प्रश्नांची उत्तरे, आता फक्त ५ चान्स

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 22, 2022 04:38 PM IST

Rohit Sharma t20 world cup: मोहाली टी-२० मध्ये भारताचा दारुण पराभव झाला. मोहालीत भारताने खूपच खराब गोलंदाजी आणि फिल्डिंग केली. यामुळे रोहित शर्मा आणि राहुल द्रविडसह संपूर्ण मॅनेजमेंट टीकाकारांच्या निशाण्यावर आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma

T20 विश्वचषक २०२२ सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या बहुराष्ट्रीय स्पर्धेसाठी १५ खेळाडूंचा संघही जाहीर केला आहे. परंतु रोहित शर्माला अद्यापही आपली मजबूत प्लेइंग इलेव्हन सापडलेली नाही. टीम इंडियाला विश्वचषकापूर्वी अजून ५ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळायचे आहेत आणि या पाच सामन्यांमध्येच रोहित शर्माला आपली मजबूत प्लईंग इलेव्हन ठरवण्याची संधी आहे.

मोहाली टी-२० मध्ये भारताचा दारुण पराभव झाला. मोहालीत भारताने खूपच खराब गोलंदाजी आणि फिल्डिंग केली. यामुळे रोहित शर्मा आणि राहुल द्रविडसह संपूर्ण मॅनेजमेंट टीकाकारांच्या निशाण्यावर आहे.

टीम इंडियासमोर पहिला प्रश्न आहे कार्तिक की पंत-

रविंद्र जडेजाच्या दुखापतीनंतर टॉप ६ मध्ये एकही डावखुरा फलंदाज नाही. संघ व्यवस्थापनाकडे यष्टिरक्षक म्हणून पंत किंवा डीके यांच्यापैकी एकाची जागा रिक्त आहे. कार्तिक फिनिशरची भूमिका चोख बजावत असताना, मधल्या फळीत डाव्या हाताच्या फलंदाजाची पोकळी भरून काढणारा पंत हा एकमेव फलंदाज आहे. अशा परिस्थितीत आता कोणाला संधी द्यायची हे ठरवण्यासाठी रोहितकडे आणखी ५ सामने आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धही टी-20 मालिका खेळायची आहे.

संघाची दुसरी समस्या खराब फिल्डिंग. भारतीय संघाच्या वाईट क्षेत्ररक्षणाचे उदाहरण मोहालीत पाहायला मिळाले. उपकर्णधार केएल राहुलने स्टीव्ह स्मिथचा झेल सोडला तर डीप मिड-विकेटमध्ये अक्षर पटेलने कॅमरून ग्रीनचा झेल सोडला. हे दोन्ही झेल टीम इंडियाच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. जडेजा संघाबाहेर गेल्यानंतर भारताचे क्षेत्ररक्षण कमकुवत झाले आहे.

भारताची समस्या क्रमांक तीन डेथ ओव्हर्स. भारतीय गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजी करत आहेत. पण डेथ ओव्हर्समध्ये भारतीय गोलंदाज खूप मोठ्या प्रमाणात धावा देत आहेत. त्यामुळे संघाला अनेकदा पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. जसप्रीत बुमराहच्या आगमनाने या विभागात नक्कीच काही सुधारणा होईल, पण बुमराहलाही दुसऱ्या टोकाहून मदत करणाऱ्या साथीदारांची गरज आहे.

खेळाडूंची फिटनेस- शेवटची सर्वात मोठी समस्या म्हणजे खेळाडूंची दुखापत. रवींद्र जडेजा दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला आहे, तर बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे पहिल्या टी-२० मध्ये भाग घेऊ शकला नाही. कोविड-१९ मुळे मोहम्मद शमी या मालिकेतून बाहेर पडला आहे. विश्वचषकापूर्वी किंवा स्पर्धेदरम्यान एक-दोन भारतीय गोलंदाज जखमी झाले, तर टीम इंडियासाठी अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे यावर लवकरात लवकर उपाय शोधणे हे टीम इंडियासाठी गरजेचे आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या