मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Manjrekar & Jadeja: जडेजा-मांजरेकर यांच्यातलं भांडण मिटलं? ३ वर्षांपूर्वी काय झालं होतं? जाणून घ्या

Manjrekar & Jadeja: जडेजा-मांजरेकर यांच्यातलं भांडण मिटलं? ३ वर्षांपूर्वी काय झालं होतं? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 29, 2022 05:47 PM IST

Sanjay Manjrekar And Ravindra Jadeja: भारत-पाकिस्तान सामन्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये रविंद्र जडेजाचा सामना कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांच्याशी झाला. यानंतर सोशल मीडियावर जडेजा आणि मांजरेकर यांच्यातील जुन्या वादाची चर्चा होऊ लागली आहे.

Manjrekar & Jadeja
Manjrekar & Jadeja

आशिया चषक स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगला. या रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने २०२१ च्या टी२० विश्वचषकातील पराभवाचा हिशेब चुकता केला आहे. या सामन्यात भारताकडून विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या यांनी उत्कृष्ट खेळी खेळली.

दरम्यान, सामन्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये जडेजाचा सामना कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांच्याशी झाला. त्यावेळी मांजरेकरांनी जड्डूला पहिलाच प्रश्न विचारला की, ‘तुला माझ्याशी बोलण्यात काही अडचण नाही ना? यावर जडेजानेही हसत उत्तर दिले आणि म्हणाला... नाही मला काही अडचण नाही’. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वास्तविक जडेजा आणि मांजरेकरांमध्ये यापूर्वी अनेकदा शाब्दिक युद्ध रंगली आहेत. मांजरेकर यांनी २०१९ वर्ल्डमध्ये जडेजाला 'बिट्स अँड पीस प्लेयर' म्हटले होते. 'बिट्स अँड पीस प्लेयर' म्हणजे असा खेळाडू जो खेळाच्या प्रत्येक भागात थोडं-थोडंच योगदान देऊ शकतो. या वक्तव्यावर जडेजा भडकला आणि त्यानेही मांजरेकर यांना सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली होती.

सोशल मीडियावर पोस्ट लिहिताना जड्डूने म्हटले होते की, “मी तुमच्यापेक्षा दुप्पट सामने खेळलो आहे आणि अजूनही खेळत आहे. ज्यांनी काही साध्य केले त्यांचा आदर करायला शिका.” तसेच जडेजाने आपल्या कामगिरीतूनही माजरेकरांना वेळोवेळी उत्तर दिले आहे. तसेच, जडेजाने आता पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध ३५ धावांची उपयुक्त खेळी खेळली.

थरारक सामन्यात भारताचा विजय

दरम्यान, आशिया चषक २०२२ मध्ये दोन्ही संघांचा हा पहिला सामना होता. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत १४७ धावा केल्या. पाकिस्तानसाठी फक्त मोहम्मद रिझवान ४३ धावांची मोठी खेळी खेळू शकला. तर टीम इंडियासाठी भुवनेश्वर कुमारने ४ आणि हार्दिक पंड्याने ३ विकेट घेतल्या. त्यानंतर हार्दिक पंड्याच्या ३३, विराट कोहलीच्या ३५ आणि रवींद्र जडेजाच्या ३५ धावांच्या जोरावर भारताने शेवटच्या षटकात विजयी लक्ष्य गाठले.

दरम्यान, भारत आता पुढील सामन्यात ३१ ऑगस्ट रोजी हाँगकाँगशी भिडणार आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा संघ २ सप्टेंबरला हाँगकाँगशी भिडणार आहे.

WhatsApp channel