मराठी बातम्या  /  क्रीडा  /  लवकरच टीम इंडियासाठी खेळताना दिसेल ‘हा’ खेळाडू, रोहित शर्माची भविष्यवाणी

लवकरच टीम इंडियासाठी खेळताना दिसेल ‘हा’ खेळाडू, रोहित शर्माची भविष्यवाणी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 13, 2022 06:39 PM IST

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने संघातील युवा खेळाडूचे तोंडभरुन कौतुक केले आहे. रोहितने म्हटले आहे की, हा खेळाडू भविष्यात टीम इंडियासाठी क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळताना दिसेल.

रोहित शर्माकडून संघातील युवा खेळाडूचे तोंडभरुन कौतुक
रोहित शर्माकडून संघातील युवा खेळाडूचे तोंडभरुन कौतुक

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने संघातील युवा खेळाडू तिलक वर्माचे तोंडभरुन कौतुक केले आहे. गुरुवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध तिलकने मॅचविनिंग खेळी केली. त्यानंतर बोलताना रोहित म्हणाला की, “तिलकचे भविष्य उज्वल असून तो लवकरच टीम इंडियासाठी तिन्ही फॅरमॅट खेळताना दिसेल.”

दरम्यान, मुंबई इंडियन्ससाठी यंदाचं आयपीएल  (IPL 2022) सीझन खुपच निराशाजनक राहिला आहे. मुंबईचा संघ सर्वात आधी प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. मात्र, १९ वर्षीय तिलक वर्माने मुंबईकडून खेळताना आपल्या फलंदाजीने अनेकांना प्रभावित केले आहे. त्याने मुंबई इंडियन्सकडून यंदाच्या सीझनमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. वर्माने आयपीएलच्या १२ डावांमध्ये ४०.८८ च्या सरासरीने आणि १३२.८५ च्या स्ट्राईक रेटने ३६८ धावा केल्या आहेत. तो यंदाच्या सीझनमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. 

सोबतच, पुढे बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, “तिलकचे हे पहिलेच वर्ष असून त्याने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे. त्याचे भविष्य उज्वल असून तो लवकरच भारतीय संघासाठी वनडे, टी-२० आणि टेस्ट हे तिन्ही प्रकारचे क्रिकेट खेळताना दिसेल, तसेच, तिलकमध्ये धावा करण्याची भूक दिसून येते. त्याच्याकडे चांगला अॅटीट्युड आहे. चांगले टेक्निकही असून एवढ्या मोठ्या स्तरावर खेळताना या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात”, असे रोहित म्हणाला. 

सुर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीत संघाला विजय मिळवून दिला -

मुंबई इंडियन्सचा भरवशाचा फलंदाज सुर्यकुमार यादव दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. त्याच्या गैरहजेरीत तिलक वर्माने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध महत्त्वाची खेळी करुन संघाला विजय मिळवून दिला. चेन्नईने मुंबईसमोर अवघे ९८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांचे पहिल्या ५ षटकांमध्येच ३३ धावांत ४ गडी तंबूत परतले होते. मात्र, तिलक वर्माने एक बाजू लावून धरत संघाला विजय मिळवून दिला. 

१९ वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकपमध्ये केले आहे टीम इंडियाचे प्रतिनिधित्व -

तिलक वर्माने २०२० मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्वही केले आहे. त्या स्पर्धेत त्याने सहा सामने खेळले. मात्र अवघ्या तीन डावांत त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्या तीन डावात त्याने ८६ धावा केल्या होत्या.

WhatsApp channel

विभाग