‘T20 साठी नवा कर्णधार शोधा, रोहित शर्माला हटवा’, सेहवागचं खळबळजनक वक्तव्य
रोहित शर्मावरील कामाचा भार कमी करण्यासाठी टी-२० संघाची जबाबदारी दुसऱ्या खेळाडूकडे दिली जाऊ शकते. यामुळे रोहितला वेळोवेळी विश्रांती घेता येईल, असे विरेंद्र सेहवागने म्हटले आहे.
टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वीच संघाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. त्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच भारताचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागनेही एक मोठे वक्तव्य केले आहे.
सेहवाग म्हणाला की, "भारताचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माच्या जागी इतर खेळाडूकडे टी-२० संघाची कमान सोपवली जाऊ शकते. ३५ वर्षीय रोहित शर्मा याच्यावरील वर्कलोड कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो", असे सेहवागने म्हटले आहे.
रोहित शर्मा हा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार झाल्यानंतर त्याला अनेक मालिकांमध्ये खेळता आलेले नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तो टीम इंडियासोबत नव्हता. यानंतर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारतातील मालिकेतही विश्रांती देण्यात आली होती. तसेच आता तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातूनही बाहेर राहू शकतो.
एक न्युज एजन्सीला बोलताना सेहवाग म्हणाला की, "जर भारतीय संघ व्यवस्थापनाच्या प्लॅनमध्ये टी-२० संघाच्या कर्णधारपदासाठी दुसरे नाव असेल, तर रोहितला टी-२० च्या कर्णधारपदावरून मुक्त केले जाऊ शकते. यामुळे रोहितवरील कामाचा ताण कमी होईल. तसेच, मानसिक तणावातूनही मुक्ती मिळेल. रोहितचे वय लक्षात घेऊन हे आवश्यक आहे".
सेहवाग पुढे म्हणाला की, "जर दुसऱ्या एखाद्या खेळाडूला T20 चे कर्णधारपद देण्यात आले तर, रोहित सहज ब्रेक घेऊ शकेल. यामुळे त्याला कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयारी करता येईल".
तसेच, "जर संघ व्यवस्थापनाला तिन्ही फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार हवा असेल तर रोहित शर्मा हा सर्वोत्तम पर्याय आहे", असेही सेहवागने म्हटले आहे.
संबंधित बातम्या