
टी -20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताचा १० विकेट्सनी धुव्वा उडवला. या पराभवामुळे टीम इंडिया पुन्हा एकदा उपांत्य फेरीतून बाहेर पडली आहे. हा सामना अॅडलेडमध्ये खेळला गेला. आता १३ नोव्हेंबरला जेतेपदाच्या लढतीत इंग्लंडचा संघ पाकिस्तानचा सामना करणार आहे. फायनल सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे.
दरम्यान, सेमी फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर रोहित शर्माने गोलंदाजांना यासाठी जबाबदार धरले आहे. भारतीय गोलंदाज दबावात चांगली कामगिरी करु शकले नाहीत असे रोहितने म्हटले आहे. तसेच, भारतीय फलंदाजीदेखील सुरुवातील फ्लॉप ठरल्याचे रोहितने सांगितले.
पराभवानंतर रोहित शर्मा काय म्हणाला
उपांत्य फेरीतील सामना हरल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, 'आम्ही आज ज्या प्रकारचा खेळ दाखवला त्यामुळे मी खूप निराश आहे. डावाच्या शेवटी आम्ही चांगली फलंदाजी केली पण सुरुवातीला आमच्या फलंदाजीत अजिबात धारदार नव्हती. तसेच, ही अशी विकेट अजिबात नव्हती. जिथे कुठलाही संघ १६ षटकात सामना संपवू शकतो. आमच्या गोलंदाजांनी खूपच निराशाजनक कामगिरी केली. आमचे गोलंदाज योग्य टप्प्यावर गोलंदाजी करु शकले नाहीत.
तसेच, रोहित पुढे म्हणाला की, “हे खरे आहे की, उपांत्य फेरीसारख्यासामन्यात खूप दबाव असतो. मात्र, आमच्या सहकारी खेळाडूंना हे नवीन नाही. सर्वांनी आयपीएलमध्ये अनेक सामने दडपणाखाली खेळले आहेत. दबावाचा सामना कसा करायचा हे तुम्ही कोणाला शिकवू शकत नाही. आम्ही ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ते खूप निराशाजनक होते”.
Rohit Sharma T20 WC: रोहित शर्मा रडला तर विराटनं टोपीनं लपवला चेहरा, टीम इंडिया निराश
तसेच, 'आम्ही सुरुवातीला थोडे नर्व्हस होतो पण विजयाचे श्रेय इंग्लंडच्या सलामीवीरांना द्यावे लागेल. त्यांनी नक्कीच शानदार खेळ दाखवला. आज आम्ही आमची रणनीती नीट पार पाडू शकलो नाही", असेही रोहित शर्मा म्हणाला.
असा झाला सामना
सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी गमावून १६८ धावा केल्या होत्या. विराट कोहलीने ४० चेंडूत ५० आणि हार्दिक पांड्याने ३३ चेंडूत ६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने १६ षटकांत १७० धावा करून सामना जिंकला. इंग्लंडकडून अॅलेक्स हेल्सने ४७ चेंडूत नाबाद ८६ धावा केल्या. तर कर्णधार जोस बटलरने ४९ चेंडूत ८० धावा केल्या.
संबंधित बातम्या
