Team India : T20 वर्ल्ड कपमधून रोहित-विराटला डच्चू, आगामी काळात अशी असेल टीम इंडिया, शास्त्रींनी सांगितलं
ravi shastri on virat and rohit sharma : कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासह स्टार फलंदाज विराट कोहली यांना टी-20 संघातून वगळले जावू शकते, असेही शास्त्री म्हणाले
टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी भारतीय संघात अनेक नवीन चेहरे, दिसतील असे शास्त्री यांना वाटते. विशेष म्हणजे, या खेळाडूंच्या निवडीबाबत कर्णधार हार्दिक पंड्याच्या शब्दाला खूप महत्त्व दिले जाईल.
तसेच, कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासह स्टार फलंदाज विराट कोहली यांना टी-20 संघातून वगळले जावू शकते, असेही शास्त्री म्हणाले.
दरम्यान रोहित आणि विराट अजूनही T20 संघाच्या प्लॅनमध्ये आहेत, परंतु ऑस्ट्रेलियात गेल्या वर्षी झालेल्या T20 विश्वचषकानंतर वरिष्ठ खेळाडूंना टप्प्याटप्प्याने बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
रवी शास्त्री यांनी 'ईएसपीएन क्रिकइन्फो'ला बोलताना सांगितले की, 'मला वाटते की ते हेच करतील (संघात नवीन खेळाडूंना संधी)'. 'टी-20 विश्वचषक येत आहे आणि युवा खेळाडूंमध्ये खूप प्रतिभा आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये आम्ही काही महान प्रतिभा पाहिल्या आहेत. हा संघ पूर्णपणे नवीन नसेल पण त्यात अनेक नवीन चेहरे नक्कीच असतील. तो (हार्दिक) आधीच या फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार आहे. फिटनेसची समस्या नसल्यास तो संघाचे नेतृत्व करत राहील".
२००७ च्या विश्वचषकाप्रमाणे आगामी विश्वचषकातही युवा खेळाडूंना संधी मिळेल, असे शास्त्री यांना वाटते. त्यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली युवा भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता. शास्त्री यांना विश्वास आहे की, 'भारतीय संघ मॅनेजमेंट पुन्हा २००७ टी-20 विश्वचषकाच्या मार्गावर जाईल. ते प्रतिभा शोधतील आणि त्यांना पर्यायांची कमतरता नसेल."
शास्त्री म्हणाले की, हार्दिकची चांगली गोष्ट म्हणजे त्याच्याकडे वर्कलोड मॅनेजमेंटची समस्या नाही. पाठीची शस्त्रक्रिया झाल्यापासून हार्दिकने कसोटी सामने खेळलेले नाहीत. शास्त्री म्हणाले, ‘सध्या हार्दिकसोबत वर्कलोड मॅनेजमेंटची कोणतीही समस्या नाही. आयपीएल आणि एकदिवसीय विश्वचषकाच्या मधल्या काळात भारतीय संघ फक्त चार-पाच सामने (मर्यादित षटकांचे सामने) खेळणार आहे. तो कसोटी संघाचा भाग नाही. त्याला कसोटी मालिकेदरम्यान विश्रांतीची संधी मिळणार आहे’.