PAK vs SL Final: श्रीलंकेनं ६ व्यांदा आशिया चषक जिंकला, पाकिस्तानचा २३ धावांनी धुव्वा
Pakistan Vs Sri Lanka Asia Cup 2022 Final: श्रीलंका संघ सहाव्यांदा आशिया चषकाचा चॅम्पियन बनला आहे. फायनलमध्ये श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तानचा २३ धावांनी पराभव केला.
आशिया चषक टी-२० स्पर्धेचा अंतिम सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना जिंकत श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले. फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा २३ धावांनी धुव्वा उडवला.
दरम्यान, सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकांत ६ गडी गमावून १७० धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा डाव २० षटकांत १४७ धावांत गारद झाला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने ४९ चेंडूत सर्वाधिक ५५ धावा केल्या. तर पाकिस्तानचे इतर फलंदाज फायनल सारख्या सामन्यात सपशेल अपयशी ठरले.
तर श्रीलंकेकडून प्रमोद मदुशान आणि वानिंदू हसरंगा हे श्रीलंकेच्या विजयाचे हिरो ठरले. दोघांनाही एकाच षटकात प्रत्येकी ३-३ बळी टिपले. त्यापूर्वी श्रीलंकेकडून भानुका राजपाक्षेने ४५ चेंडूत ७२ धावांचा पाऊस पाडला.
श्रीलंकेचा डाव
नाणेफेक हारल्यानंतर श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करावी लागली. श्रीलंकेची सुरुवात अतिशय खराब झाली. त्यांचा पहिला विकेट पहिल्याच षटकात पडला. त्यानंतर श्रीलंकेने अवघ्या ५८ धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. पथुम निसांका (८), कुसल मेंडिस (०), धनंजय डी सिल्वा (२८), दानुष्का गुनाथिलका (१), दासून शनाका (२) हे फलंदाज लवकर बाद झाले.
मात्र, त्यानंतर भानुका राजपक्षेने डावाची सुत्रे हाती घेतली. त्याने झंझावाती ७१ धावांची खेळी केली. राजपाक्षेने प्रथम हसरंगासोबत सहाव्या विकेटसाठी ३६ चेंडूत ५८ धावांची भागीदारी रचली. हसरंगाने २१ चेंडूत ३६ धावांच्या खेळीत पाच चौकार आणि एक षटकार ठोकला.
राजपक्षेने ३५ चेंडूत टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक ठोकले. हसरंगा बाद झाल्यानंतर राजपाक्षेने चमिका करुणारत्नेसोबत सातव्या विकेटसाठी ३१ चेंडूत ५४ धावांची नाबाद भागीदारी केली. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये प्रथमच एका संघाने ६ व्या आणि ७ व्या विकेटसाठी ५०+ धावांची भागीदारी केली आहे.
श्रीलंकेकडून भानुका राजपक्षेने तुफानी ४५ चेंडूत ७१ धावा केल्या. राजपक्षेने ७१ धावांच्या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याने १५७.७८ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. तर पाकिस्तानकडून हरिस रौफने सर्वाधिक ३ बळी घेतले.