KL Rahul : केएल राहुलला शेवटच्या दोन संधी, उपकर्णधार पदावरून हकालपट्टी?
kl rahul been removed from vice captaincy : ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर-गावस्कर कसोटी ट्रॉफीच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. केएल राहुलचाही संघात समावेश करण्यात आला आहे, मात्र बीसीसीआयने त्याला मोठी शिक्षा दिली आहे.
बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघात कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. मात्र, काहीही न बोलता बीसीसीआयने केएल राहुलबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
वास्तविक राहुलला कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे. या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी राहुलचा उपकर्णधार म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. राहुलला शेवटच्या दोन कसोटींसाठीही संघात ठेवण्यात आले आहेय पण त्याच्या नावापुढे उपकर्णधार लावण्यात आलेले नाही.
बीसीसीआयने शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी घोषित केलेल्या संघात रोहित शर्मा कर्णधार आहे. त्याचबरोबर केएल राहुलचे नाव केवळ एक खेळाडू म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले आहे. अशा स्थितीत सततच्या निराशाजनक कामगिरीमुळे बीसीसीआयने केएल राहुल बाबत अॅक्शन घेतल्याचे बोलले जात आहे.
केएल राहुलने ऑस्ट्रेलियासाठी दोन कसोटी सामन्यांच्या तीन डावात केवळ ३८ धावा केल्या आहेत. मात्र, प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याचा सातत्याने बचाव केला असून काही सामन्यांतील त्याच्या खराब कामगिरीवरून त्याला जज करता येणार नाही, असे म्हटले आहे. कदाचित त्यामुळेच त्याला शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात ठेवण्यात आले आहे.
केएल राहुलच्या कसोटीतील कामगिरीवर नजर टाकली तर त्याने ४७ कसोटी सामन्यांमध्ये ३३.४४ च्या सरासरीने केवळ २६४२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ७ शतके आणि १३ अर्धशतके केली आहेत. अशा परिस्थितीत जवळपास ५० कसोटी सामने खेळलेल्या राहुलसाठी संघात धोक्याची घंटा वाजली आहे, कारण त्याला वारंवार संधी दिली जात असली तरी तो त्यावर खरा उतरू शकलेला नाही.
सरफराज खान, पृथ्वी शॉ, शुबमन गिल आणि मयंक अग्रवाल हे देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या बॅटने सतत चमकदार कामगिरी करत आहेत. हे खेळाडू संघात त्याची जागा घेण्यासाठी रांगेत उभे आहेत. अशा स्थितीत उपकर्णधारपदावरून त्याची हकालपट्टी हे त्याच्यासाठी शेवटचा इशारा असल्याचे संकेत असू शकतात.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटींसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, एस गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, आर. जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.