INDvsIRE: शेवटची ओव्हर उमरान मलिकलाच का? कॅप्टन पांड्याने सांगितले कारण
उमरान मलिकने (umran malik) सामन्यातील शेवटचे षटक टाकले. त्या षटकात आयर्लंड संघाला १७ धावा करायच्या होत्या. अशा प्रसंगी युवा गोलंदाजावर विश्वास दाखवल्याबद्दल कर्णधार हार्दिकचे (hardik pandya) कौतुक केले जात आहे.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिली टी-२० मालिका जिंकली आहे. टीम इंडियाने (india vs ireland) मंगळवारी (२८ जून) आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात ४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २२५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आयर्लंडच्या संघानेही २२१ धावांपर्यंत मजल मारली.
दरम्यान, उमरान मलिकने सामन्यातील शेवटचे षटक टाकले. त्या षटकात आयर्लंड संघाला १७ धावा करायच्या होत्या. अशा प्रसंगी युवा गोलंदाजावर विश्वास दाखवल्याबद्दल कर्णधार हार्दिक पांड्याचे कौतुक केले जात आहे.
हार्दिकने उमरान मलिकलाच शेवटच्या आणि निर्णायक षटकात गोलंदाजी का दिली, याचे कारण हार्दिकनेच सांगितले आहे. तो म्हणाला की, “मी माझ्या प्लॅननुसार सर्व दबाव दूर करण्याचा प्रयत्न करत होतो. मी उमरानला पाठिंबा दिला. त्याच्याकडे स्पीड आहे आणि अशा स्पीडसमोर १७ धावा करणे नेहमीच कठीण असते", सोबतच 'आयर्लंडच्या फलंदाजांनी काही अप्रतिम फटके खेळले. त्यांनी खूप चांगली फलंदाजी केली. आमच्या गोलंदाजांनी शेवटच्या क्षणापर्यंत संयम राखला म्हणून मला त्यांचे कौतुक करायचे आहे', असेही हार्दिक म्हणाला.
सोबतच आयर्लंडमधील क्रिकेट चाहते हे संजू सॅमसन आणि दिनेश कार्तिक यांचे खूप मोठे फॅन्स आहेत. त्यांना सपोर्ट करण्यासाठीच मैदानात इतकी गर्दी झाली होती, असेही हार्दिक पांड्याने सामन्यानंतर सांगितले आहे.
दरम्यान,सामन्यात टीम इंडियाने २० षटकात ७ विकेट गमावून २२५ धावा केल्या होत्या. दीपक हुडाने १०४ आणि संजू सॅमसनने ७७ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात आयर्लंडने २० षटकांत ५ बाद २२१ धावा केल्या. उमरान मलिकने शेवटच्या षटकात चांगली गोलंदाजी केली, त्याने आयर्लंडला विजयासाठी आवश्यक असणाऱ्या १७ धावा करू दिल्या नाहीत.
शेवटच्या षटकात आयर्लंड संघाला १२ धावाच करता आल्या. या विजयासह भारताने दोन सामन्यांची T20I मालिका २-० ने जिंकली. भारताने पहिला टी-२० सामना ७ विकेट्सने जिंकला होता.
संबंधित बातम्या