'हिरे की परख...' सर्वप्रथम रोहितनेच ओळखलं होतं, दिनेश कार्तिक काय करु शकतो
रोहित शर्माने (rohit sharma) ४ वर्षांपूर्वीच दिनेश कार्तिकचा (dinesh karthik) फिनिशर म्हणून वापर केला होता. त्याच सामन्यात कार्तिकने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाची खेळी खेळली होती.
आयपीएल २०२२ (ipl 2022) पूर्वी दिनेश कार्तिकने (dinesh karthik) सांगितले होते की त्याला भारतीय संघात (team india) परतायचे आहे. २०२२ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये (t20 world cup 2022) टीम इंडियासाठी फिनिशरची भूमिका बजावायची आहे. पण त्यावेळी कार्तिकचे हे स्वप्न पूर्ण होईल, याची कोणालाच खात्री नव्हती. पण आयपीएल २०२२ मध्ये कार्तिकने आरसीबीसाठी फिनिशर म्हणून तुफानी फलंदाजी केली आणि आयपीएल स्पर्धा संपण्यापूर्वीच त्याने टीम इंडियामध्ये आपले स्थान निश्चित केले.
२०१९ नंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या कार्तिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत शानदार फलंदाजी केली. मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताचे सलामीचे फलंदाज लवकर बाद झाले. अशा स्थितीत कार्तिकने अवघड खेळपट्टीवर वेगाने धावा केल्या, तसेच, अर्धशतक झळकावून भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. या सामन्यात भारताने टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय नोंदवला. सोबतच मालिकेतही २-२ अशी बरोबरी केली. या खेळीनंतर टीम इंडियामध्ये फिनिशर दिनेश कार्तिकचे स्थान पक्के झाले आहे.
रोहित शर्माने चार वर्षांपूर्वी दिनेश कार्तिकमध्ये दडलेला फिनिशर पाहिला होता. श्रीलंकेत झालेल्या निदाहास ट्रॉफीच्या फायनलमध्ये रोहित टीम इंडियाचा कर्णधार होता. बांगलादेशविरुद्धच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाची अवस्था अतिशय वाईट झाली होती. कार्तिक सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणार होता, पण रोहितने विजय शंकरला त्याच्या आधी पाठवले. यामुळे कार्तिक संतापला. रोहित आऊट होऊन ड्रेसिंग रूममध्ये गेला तेव्हा कार्तिक म्हणाला की "तू माझ्यावर अन्याय केला आहेस", यावर रोहित म्हणाला की, 'तू आमच्यासाठी सामना फिनीश करावा, अशी माझी इच्छा आहे', शेवटच्या ओव्हर्समध्ये तुझी गरज भासेल, जेव्हा अनुभवी मुस्तफिझूर रहमान गोलंदाजीला येईल तेव्हा अनुभवी फलंदाज असणे गरजेचे आहे. त्यामुळे तु सातव्या क्रमांकावर फलंदाजीला जा'.
यानंतर रोहितचे बोलणे ऐकून कार्तिकला आणखी राग आला. यानंतर रोहित तेथून निघून गेला. रोहितला काही काळ शांत राहायचं होतं. यानंतर कार्तिक मैदानात गेला आणि त्याने ८ चेंडूंत २९ धावा ठोकल्या. त्याने सामन्यात ३६२.५० च्या स्ट्राइक रेटने धावा चोपल्या. शेवटच्या चेंडूवर भारताला विजयासाठी ५ धावांची गरज होती, तेव्हा कार्तिकने षटकार ठोकत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. यानंतर मात्र, कार्तिकने रोहितचे आभार मानले.
२०१८ मध्ये दिनेश कार्तिकला शेवटी फलंदाजीला पाठवल्याचा राग आला असेल, परंतु आता त्याने ही भूमिका स्वीकारली आहे. तो आयपीएल २०२२ मध्ये आरसीबीसाठी फिनिशर म्हणूनच खेळला. त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये १६ सामन्यांमध्ये त्याने ३३० धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट १८३.३३ इतका तगडा होता. या कामगिरीच्या जोरावर कार्तिक वयाच्या ३७ व्या वर्षी टीम इंडियात दणक्यात पुनरागमन केले. त्याच्या पुनरागमनानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने चार डावात ४६ च्या सरासरीने आणि १५८.६२ च्या स्ट्राईक रेटने ९२ धावा केल्या आहेत.