IND Vs WI: टीम इंडियासमोर मोठं टेन्शन! शेवटचे दोन T-20 रद्द होणार?
भारत आणि वेस्ट इंडिज (IND Vs WI) यांच्यातील शेवटचे दोन टी-२० सामने अमेरिकेत होणार आहेत. दोन्ही संघातील खेळाडूंना मियामीला जाण्यासाठी अद्याप व्हिसा मिळालेला नाही. अशा परिस्थितीत बुधवारी एक बैठक होणार आहे, ज्यामध्ये खेळाडूंना अमेरिकन दूतावासात जावे लागणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ५ सामन्यांची टी-20 मालिका सुरू असून तीन सामन्यांनंतर टीम इंडिया २-१ ने पुढे आहे. या मालिकेतील शेवटचे २ सामने आता अमेरिकेत होणार आहेत. मात्र त्या आधी मोठी अडचण निर्माण झाली आहे. टीम इंडियाला अद्यापही अमेरिकेचा व्हिसा मिळालेला नाही.
एका मीडिया रिपोर्टनुसार, भारत आणि वेस्ट इंडिजचे संघ व्हिसा संबंधित समस्येसाठी गयानाला जाणार आहेत. तेथे अमेरिकन दूतावास आहे.
दरम्यान, चौथा T20 ६ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे क्रिकेट वेस्ट इंडिजला आशा आहे की, तोपर्यंत ही समस्या दूर होईल. कारण तसे झाले नाही तर सामना पुढे ढकलण्याची किंवा रद्द होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
अमेरिकेत क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी तेथे क्रिकेट सामने आयोजित करण्यात येत आहेत. भारतीय क्रिकेट संघ हा प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळे तेथे सामने खेळल्यास प्रेक्षकांची संख्या वाढू शकते. पण आता ५ सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये अडचण निर्माण झाली आहे.
व्हिसा मिळेल- वेस्ट इंडिज क्रिकेट
या संपूर्ण प्रकरणात क्रिकेट वेस्ट इंडिजकडून एक खुलासा करण्यात आला आहे. ते म्हणाले की, "गयाना येथे बुधवारी सर्व खेळाडूंची अपॉइंटमेंट बुक करण्यात आली आहे. सर्व कागदपत्रे तयार आहेत. आम्हाला पूर्ण आशा आहे की व्हिसा मिळेल. मात्र त्या गोष्टीवर त्यावर आमचे नियंत्रण नाही".
मालिकेच्या मॅनेजमेंटमध्ये अनेक समस्या-
मालिकेतील शेवटचे दोन टी-20 सामने ६ आणि ७ ऑगस्ट रोजी होणार आहेत. जर टीम इंडियाला व्हिसा मिळाला तर मियामीहून गयानाला जाण्यासाठी ५ तास लागतात. या मालिकेतील मॅनेजमेंटबाबत अनेक समस्या आहेत. कारण या आधी टीम इंडियाचे सामान सेंट किट्सपर्यंत वेळेत पोहोचले नव्हते. ज्यामुळे दुसरा आणि तिसरा टी-20 सामना खूप उशिरा सुरू झाला होता.