मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ind vs Pak: भारत-पाकिस्तान फायनलमध्ये कधीच भिडले नाहीत, पाहा कोण ठरलंय वरचढ

Ind vs Pak: भारत-पाकिस्तान फायनलमध्ये कधीच भिडले नाहीत, पाहा कोण ठरलंय वरचढ

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 15, 2022 05:05 PM IST

India Vs Pakistan in Asia Cup:आशिया चषकाच्या अंतिम फेरीत आतापर्यंत भारताचा पाकिस्तानशी सामना झालेला नाही. भारत हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असून ७ वेळचा चॅम्पियन आहे. दोन्ही संघांमध्ये आशिया कपमध्ये एकूण १४ सामने झाले आहेत. यातील ८ सामने भारताने तर ५ पाकिस्तानने जिंकले आहेत.

Ind vs Pak
Ind vs Pak

आशिया कप २७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. यावेळी भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. आशिया चषक स्पर्धेत हे दोन्ही संघ १५व्यांदा आमनेसामने येणार आहेत. मात्र, आतापर्यंत हे दोन्ही संघ आशिया कपच्या फायनलमध्ये भिडलेले नाहीत. बऱ्याच काळापासून भारत आणि पाकिस्तान हे संघ आशियातील बलाढ्य संघांपैकी एक आहेत आणि दोघेही आशिया चषक जिंकण्याचे प्रबळ दावेदार आहेत, परंतु आतापर्यंत दोन्ही संघ एकत्र फायनलमध्ये पोहोचलेले नाहीत. मात्र, यावेळी दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता बऱ्यापैकी आहे.

गेल्या ३८ वर्षात आशिया चषक १४  वेळा खेळला गेला असून केवळ भारताने ही स्पर्धा ७ वेळा जिंकली आहे. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध १४ सामने खेळले असून ८ सामने जिंकले आहेत. 

१९९५ च्या आशिया कपमध्ये भारत पहिल्यांदा पाकिस्तानकडून पराभूत

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कपमधील पहिला सामना १९८४ मध्ये झाला होता. टीम इंडियाने हा सामना ५४ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. यानंतर १९८८ मध्येही भारतीय संघाने पाकिस्तानवर ४ गडी राखून विजय मिळवला होता. 

१९९५ मध्ये आशिया चषकात पहिल्यांदाच टीम इंडियाचा पाकिस्तानकडून पराभव झाला होता. शारजाहच्या मैदानावर पाकिस्तानने भारताचा ९७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. १९९७ मध्ये दोन्ही संघांमध्ये दोन सामने झाले होते, परंतु ते दोन्ही सामने अनिर्णित राहिले.

२००० आणि २००४ मध्येही पाकिस्तानने भारताचा ४४ आणि ५९ धावांच्या फरकाने पराभव केला होता, पण २००८ मध्ये भारताने पुनरागमन करत ६ विकेट्सने विजय मिळवला. याच स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून ८ गडी राखून पराभव पत्करावा लागला. यानंतर भारताने २०१० मध्ये ३ विकेट्स आणि २०२१ मध्ये ६ गडी राखून पाकिस्तानवर विजय मिळवला होता. तर २०१४ मध्ये पाकिस्तानने एका रोमांचक सामन्यात भारताचा १ विकेटने पराभव केला होता. आशिया चषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानकडून पराभव होण्याची ही शेवटची वेळ होती.

टी-२० आशिया कप २०१६ मध्ये पहिल्यांदाच आमने सामने

२०१६ मध्ये प्रथमच आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 सामना खेळला गेला आणि भारताने हा सामना ५ गडी राखून जिंकला होता. त्यानंतर आशिया चषकात भारताचा पाकिस्तानकडून पराभव झालेला नाही. २०१८ मध्ये दोन्ही संघांमध्ये २ सामने झाले आणि भारताने पहिला सामना ८ गडी राखून जिंकला, तर दुसरा सामना ९ गडी राखून जिंकला होता. आता चार वर्षांनंतर आशिया कपमध्ये दोन्ही संघ पुन्हा आमने-सामने येणार आहेत. या स्पर्धेत दोन्ही संघ दुसऱ्यांदा टी-२० सामने खेळणार आहेत.

या स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण १४ सामने झाले आहेत. यातील ८ सामने भारताने तर ५ पाकिस्तानने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित आहे. २०१४ पासून आशिया चषक स्पर्धेत भारत पाकिस्तानकडून हरलेला नाही. 

WhatsApp channel