INDvsENG: ‘खऱ्या’ कसोटीत भारताचा पराभव, इंग्लंडमध्ये मालिका विजयाचं स्वप्न भंगले
पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली. मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले होते. एक सामना अनिर्णित राहिला तर उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवून इंग्लंडने मालिका बरोबरीत राखण्यात यश मिळवले आहे.
एजबॅस्टन कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. या पराभवासह भारताचे १५ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका विजयाचे स्वप्न भंगले आहे. पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली. मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले होते. एक सामना अनिर्णित राहिला तर उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवून इंग्लंडने मालिका बरोबरीत राखण्यात यश मिळवले आहे.
दरम्यान, भारताने विजयासाठी इंग्लंडसमोर ३७८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडने हे लक्ष्य आरामात पूर्ण केले. त्यांच्याडून जो रुट आणि जॉनी बेअरस्टॉ या दोघांनी शानदार शतके ठोकली. बेअरस्टोने पहिल्या डावातही शतकी खेळी केली होती. त्याचे हे कसोटीतील सलग चौथे शतक ठरले आहे. यापूर्वी न्युझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने दोन सामन्यात दोन सलग शतके ठोकली होती.
बेअरस्टॉने दुसऱ्या डावात नाबाद ११४ धावा केल्या. त्याने या खेळीत १५ चौकार आणि एक षटकार ठोकला. तसेच जो रुटने १९ चौकार आणि एका षटकाराच्या साह्याने १४२ धावा कुटल्या. दोघांनी चौथ्या विकेटसाठी दोनशेहून अधिक धावांची भागीदारी रचली. सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला अवघ्या ११९ धावांची आवश्यकता होती. इंग्लंडने एकही विकेट न गमावता हा टप्पा पूर्ण केला.
तत्पूर्वी, शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या डावात रिषभ पंत आणि रवींद्र जडेजाच्या शतकांमुळे भारताने ४१६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ २८४ धावा करू शकला. त्यामुळे पहिल्या डावात भारताला १३२ धावांची आघाडी मिळाली होती. भारताने दुसऱ्या डावात २४५ धावा केल्या. आघाडी आणि या दुसऱ्या डावातील धावा मिळून भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७८ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
या पाच सामन्यांच्या मालिकेचे २०२१ मध्ये आयोजन करण्यात आले होते. पहिल्या ४ सामन्यांमध्ये भारत २-१ ने आघाडीवर होता. मात्र, त्यावेळेस कोरोनामुळे सर्व सामने होऊ शकले नव्हते. एक सामना शिल्लक राहिला होता. तो यावेळेस एजबॅस्टन येथे खेळवण्यात आला. भारताला १५ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी होती, पण भारतीय संघाने ती गमावली आहे.