मराठी बातम्या  /  क्रीडा  /  KL Rahul : केएल राहुलनं एकाच डावात हवा बदलली; सर्वात मोठा टीकाकार असलेला हा दिग्गज बनला फॅन, पाहा

KL Rahul : केएल राहुलनं एकाच डावात हवा बदलली; सर्वात मोठा टीकाकार असलेला हा दिग्गज बनला फॅन, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 18, 2023 10:51 AM IST

venkatesh prasad praise kl rahul after ind vs aus 1st odi: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात केएल राहुलच्या खेळीने भारताला विजय मिळवून दिला. संघ कठीण परिस्थितीत होता पण राहुलने जडेजासोबत शतकी भागीदारी रचली. या खेळीनंतर राहुलचे सर्वात मोठे टीकाकार व्यंकटेश प्रसाद हेही त्याचे चाहते झाले आहेत.

KL Rahul ind vs aus 1st odi
KL Rahul ind vs aus 1st odi

India vs Australia (IND vs AUS) 1st ODI : मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या शानदार गोलंदाजीनंतर केएल राहुलच्या संयमी अर्धशतकाच्या जोरावर भारताने ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून पराभव केला.

भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल गेल्या काही काळापासून फॉर्मशी झुंजत होता. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिल्या दोन सामन्यांनंतर त्याच्याकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आले. त्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळण्यात आले. पण पहिल्या वनडेत त्याने नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

व्यंकटेश प्रसाद यांनी टीका केली होती

भारताचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी केएल राहुलच्या कसोटी संघातील स्थानाबाबत उघडपणे विरोध केला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान त्यांनी एकामागून एक ट्विट करत राहुलवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी राहुलची कसोटीतील आकडेवारीही शेअर केली. यावर प्रसाद यांचे भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राशी भांडणही झाले होते. या ट्विटवर बराच गदारोळ झाला होता.

आता प्रसाद यांच्याकडून केएल राहुलचे कौतुक

मुंबई वनडेनंतर व्यंकटेश प्रसाद यांनी केएल राहुलचे कौतुक केले आहे. राहुलचा फोटो ट्विटरवर शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, “दबावात केएल राहुलची शानदार खेळी. टॉप नॉक. रवींद्र जडेजानेही पूर्ण साथ दिली आणि भारताला चांगला विजय मिळवून दिला”.

केएल राहुलची ७५ धावांची मॅचविनिंग खेळी

दीर्घकाळापासून खराब फॉर्ममुळे टीकेचा सामना करत असलेल्या राहुलने ९१ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ७५ धावा केल्या. त्याचवेळी जडेजाने ६९ चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ४५ धावा केल्या.

त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना १८८ धावा केल्या. भारताने केवळ ८३ धावांत ५ विकेट गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर जडेजा आणि राहुलने शतकी भागीदारी रचून संघाला विजय मिळवून दिला.

WhatsApp channel