दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या तीन देशांच्या महिलांच्या तिरंगी टी-२० मालिकेत भारताने सलग दुसरा विजय मिळवला आहे. ईस्ट लंडनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजचा ५६ धावांनी पराभव केला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना २७ धावांनी जिंकला होता. दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा सलग दुसरा पराभव आहे. याओआधीच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा दक्षिण आफ्रिकेकडून ४४ धावांनी पराभव झाला होता.
गुणतालिकेत भारत (८ गुण) पहिल्या, दक्षिण आफ्रिका (४ गुण) दुसऱ्या आणि वेस्ट इंडिज (शून्य) तिसऱ्या स्थानावर आहे.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने २० षटकात २ बाद १६७ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ २० षटकांत ४ गडी गमावून १११ धावाच करू शकला. भारताच्या सलामीवीर स्मृती मानधना आणि यास्तिका भाटिया यांनी पहिल्या विकेटसाठी ५.५ षटकात ३३ धावांची भागीदारी केली. यास्तिका २३ चेंडूत १८ धावा करून बाद झाली.
यास्तिकानंतर क्रीझवर आलेली हरलीन देओलही मोठी खेळी खेळू शकली नाही. नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ती शनिका ब्रूसची शिकार झाली. हरलीनने ११ चेंडूत १२ धावा केल्या. दोन विकेट पडल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर क्रीझवर आली. त्यानंतर तिने स्मृती मानधनासोबत शानदार भागिदारी रचली. दोघींनी मिळून वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
मंधानाने टी-20 मधील तिचे २०वे अर्धशतक झळकावले. त्याचवेळी हरमनप्रीत कौरने शेवटच्या षटकात कारकिर्दीतील नववे अर्धशतक पूर्ण केले. हरमनप्रीत आणि स्मृती यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७० चेंडूत ११५ धावांची भागीदारी केली. अखेरच्या १० षटकांत दोघांनी १०७ धावा चोपल्या.
स्मृती मानधना ५१ चेंडूत ७४ धावा करून नाबाद राहिली. तिने १० चौकार आणि एक षटकार मारला. तर हरमनप्रीतने ३५ चेंडूत नाबाद ५६ धावा केल्या. तिने ८ चौकार मारले.
वेस्ट इंडिजच्या डावाबद्दल बोलायचे झाले तर शमाईन कॅम्पबेलने सर्वाधिक ४७ धावा केल्या. तर कर्णधार हेली मॅथ्यूज ३४ धावा करून नाबाद राहिली. या दोघींशिवाय फक्त एफी फ्लेचरला दुहेरी आकडा स्पर्श करता आला. एफीने नाबाद १० धावा केल्या. तर भारताकडून दीप्ती शर्माने दोन बळी घेतले. राजेश्वरी गायकवाड आणि राधा यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.
संबंधित बातम्या