मराठी बातम्या  /  क्रीडा  /  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव! कपिलची कॅच, धोनीचा सिक्स, गाबाचा घमंड! पाहा अंगावर काटा आणणारे प्रसंग

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव! कपिलची कॅच, धोनीचा सिक्स, गाबाचा घमंड! पाहा अंगावर काटा आणणारे प्रसंग

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 13, 2022 07:43 PM IST

Best Moments in Indian Cricket History: भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो. करोडो लोकांना या खेळाचे विलक्षण वेड आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. क्रिकेटमध्येही या ७५ वर्षांत भारतासाठी असे अनेक ऐतिहासिक क्षण आले आहेत. ते क्षण आठवल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.

Best Moments in Indian Cricket History
Best Moments in Indian Cricket History

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. प्रत्येक क्षेत्रातील लोक या उत्सवात सामील होत आहेत. तसेच देशाच्या ७५ वर्षांच्या इतिहासातील सोनेरी क्षण आठवत आहेत. जर क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर आज भारत या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचा संघ मजबूत आणि दिग्गज खेळाडूंनी भरलेला आहे.

क्रिकेटमध्येही गेल्या ७५ वर्षात भारतासाठी असे अनेक ऐतिहासिक क्षण आले आहेत. ते क्षण आठवल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. 

१) भारताचा पहिला कसोटी विजय-

भारताने १९३२ मध्ये कसोटी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. पण भारताला कसोटीत पहिला पहिला विजय २० वर्षे वाट पाहावी लागली. भारताला पहिला कसोटी विजय हा १९५२ मध्ये मिळाला. म्हणजेच स्वतंत्र भारतातच भारताला पहिला कसोटी विजय मिळाला होता. २० वर्षांनंतर आणि एकूण २४ सामन्यांनंतर भारताने चेन्नईमध्ये इंग्लंडचा पराभव करून पहिली कसोटी जिंकली होती.

२) इंग्लंडमध्ये पहिला कसोटी विजय-

भारताने १९७१ मध्ये इंग्लंडमध्ये जाऊन पहिली कसोटी मालिका जिंकली. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने ३ सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली होती. इंग्लंडमध्ये मालिका जिंकणे ही भारतीय क्रिकेटसाठी मोठी उपलब्धी होती.

३) १९८३ मध्ये वर्ल्ड कप जिंकला-

भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये १९८३ चा विश्वचषक जिंकला. नवखा संघ म्हणून इंग्लंडमध्ये पोहोचलेल्या टीम इंडियाने अंतिम फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव केला. अंतिम सामन्यात व्हिव्हियन रिचर्ड्सचा कपिल देवने पकडलेला झेल ऐतिहासिक ठरला.

४) शारजा कपमध्ये सचिनची डेझर्ट स्टॉर्म इनिंग

१९९८ च्या शारजा कपमध्ये सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १४३ धावांची खेळी केली होती, सचिनच्या या इनिंगला डेझर्ट स्टॉर्म असे म्हटले जाते. ही इनिंग पाहताना आजही प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या अंगावर काटा येतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेली ही खेळी वनडे इतिहासातील सर्वोत्तम खेळी मानली जाते.

५) पहिल्याच टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत विजेता

२००७ च्या वनडे विश्वचषकात टीम इंडिया पहिल्याच फेरीत बाहेर पडली होती. मात्र, वर्षाच्या शेवटी टीम इंडियाने पहिल्यांदाच होत असलेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये बाजी मारली आणि स्पर्धेचे जेतेपद पटकावले. फायनलमध्ये मिस्बाह-उल-हकने जोगिंदर शर्माच्या गोलंदाजीवर तो फटका मारला तेव्हा संपूर्ण देशाचा श्वास थांबला होता. मात्र, काही सेकंदानंतर चेंडूखाली येत श्रीसंतने झेल पकडला तेव्हा भारतीयांनी एकच जल्लोष केला. भारताने शेवटच्या षटकात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धुळ चारुन वर्ल्डकप जिंकला होता.

६) २०११ वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धोनीचा यादगार षटकार-

यानंतर बरोबर चार वर्षांनी जेव्हा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वनडे वर्ल्डकपची फायनल झाली. तेव्हा महेंद्रसिंग धोनीने विजयी षटकार ठोकला होता. २८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. हा सचिन तेंडुलकरचा शेवटचा क्रिकेट विश्वचषक ठरला. संपूर्ण देश त्या रात्री रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा करत होता.

७) अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात नवख्या टीम इंडियाने गाबाचा घमंड उतरवला

२०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे, २०१४ मध्ये लॉर्ड्सवर कसोटी जिंकणे, २०२१ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकणे, हे सर्व भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सोनेरी आणि ऐतिहासिक क्षण आहेत.

तसेच, गाबा येथे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात नवख्या टीम इंडियाने गाबाचा घमंड उतरवला. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली होती. ते क्षण देखील भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या अंगावर काटा आणणारे ठरले.

WhatsApp channel