IND vs AUS: नागपुरात आज पावसाची बॅटिंग? भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर प्रश्नचिन्ह
Nagpur rain- India vs Australia T20i Series : भारत-ऑस्ट्रेलिया टी-२० मालिका सुरु आहे. मालिकेतील दुसरा सामना आज नागपुरात होणार आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे सामना होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला टी-20 मालिकेत चांगली सुरुवात करता आलेली नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये (IND vs AUS) भारताचा ४ विकेट्सनी पराभव झाला. या सामन्यात भारताने २०० हून अधिक धावा केल्या होत्या. तरीही संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. या मालिकेतील दुसरा सामना आज (२३ सप्टेबर) नागपुरात होणार आहे. मालिकेतील आव्हान टिकण्यासाठी भारतीय संघाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे.
पण या सामन्याबाबत एक वाईट बातमी आहे. या निर्णायक सामन्यावर पावसाचे सावट आहे. अशा स्थितीत सामन्यात अडथळा येऊ शकतो.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारी नागपुरात जोरदार पावसाची शक्यता आहे. खात्याने नागपुरात यलो अलर्ट जारी केला आहे. संध्याकाळी ७ ते ११ दरम्यान पाऊस पडू शकतो. पावसाचा अडथळा आला तर सामन्याची षटकेही कमी करावी लागू शकतात.
बुमराह पुनरागमनाच्या तयारीत
या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. दुखापतीनंतर तो पुनरागमन करत आहे. अशा स्थितीत तो दुसऱ्या सामन्यात खेळणार हे निश्चित आहे. पहिल्या सामन्यात भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि उमेश यादव हे वेगवान गोलंदाज चांगलेच महागडे ठरले होते. लेगस्पिनर युझवेंद्र चहललाही विशेष कामगिरी करता आली नाही. तर डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने किफायतशीर गोलंदाजी करताना ३ बळी घेतले होते.
ही मालिका राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मासाठी महत्त्वाची
ऑस्ट्रेलियाविरुद्धचे उर्वरित २ सामने प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मासाठी महत्त्वाचे आहेत. नुकत्याच झालेल्या आशिया चषकातही संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. सुपर-४ मध्ये संघाला श्रीलंका आणि पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक होणार आहे. अशा स्थितीत सर्व खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे.
संबंधित बातम्या