IND vs WI: तिसऱ्या T20 मध्ये टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१ अशी आघाडी
भारताकडून सुर्यकुमार यादवने सर्वाधिक ७६ धावा केल्या. या विजयासह ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ ने आघाडी घेतली आहे.
IND vs WI 3rd T20: तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ७ विकेट्सनी पराभव केला आहे. वेस्ट इंडिजने भारतासमोर १६४ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान १९ षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. भारताकडून सुर्यकुमार यादवने सर्वाधिक ७६ धावा केल्या. या विजयासह ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ ने आघाडी घेतली आहे.
दरम्यान, १६५ धावांचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरुवात केली. मात्र, चांगल्या लयीत असलेला रोहित शर्मा दुसऱ्याच षटकात जखमी झाला. हॅमस्ट्रिंगच्या समस्येमुळे तो मैदानाबाहेर गेला. रोहितने पाच चेंडूत ११ धावा केल्या. त्याने १ चौकार आणि १ षटकार मारला. त्यानंतर दुसरा सलामीवीर सुर्यकुमार यादवने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. त्याने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. सुर्याने अवघ्या ४४ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या साह्याने ७४ धावा ठोकल्या. सुर्याशिवाय श्रेयस अय्यरने २४ आणि रिषभ पंतने ३३ धावांचे योगदान दिले. पंत आणि दीपक हुडा नाबाद राहिले.
वेस्ट इंडिजचा डाव-
तत्पूर्वी, भारताने टॉस जिकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीस आलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली. त्यांच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकीय भगीदारी केली. सलामीवीर काइल मेयर्सने सर्वाधिक ७३ धावा केल्या. मात्र, दुसरा सलामीवीर ब्रेंडन किंग बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. अखेरीस रोव्हमन पॉवेल (२३ धावा) आणि शिमरॉन हेटमायर (२० धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे संघाची धावसंख्या १६४ धावांपर्यंत पोहोचली. या दोन फलंदाजांनी मिळून १९ चेंडूत ३४ धावांची भागीदारी केली.
काइल मेयर्सने वेस्ट इंडिजसाठी ७३ धावांची मोठी खेळी खेळली, ज्यात त्याने ८ चौकार आणि ४ षटकार मारले. या सामन्यात टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने २, तर हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगला प्रत्येकी एक विकेट घेतला.