Rohit Sharma Injury: रोहित शर्मा उर्वरित मालिकेतून बाहेर? BCCI ची मोठी अपडेट
तिसऱ्या टी-२० सामन्यात फलंदाजी करताना रोहित शर्माला दुखापत झाली. तो अवघे पाच चेंडू खेळून तंबूत परतला. बीसीसीआयने ट्विटद्वारे रोहितच्या दुखापतीविषयी माहिती दिली आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला मोठा धक्का बसला. या सामन्यात केवळ पाच चेंडू खेळून कर्णधार रोहित शर्मा पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहितला पाठदुखीचा त्रास होत असल्याने त्याला पुढे फलंदाजी करता आली नाही. आता बीसीसीआयने त्याच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे.
रोहित शर्माने अल्झारी जोसेफला षटकार आणि एक चौकार मारल्यानंतर एक धाव घेतली. त्यानंतर अचानक त्याची पाठ दुखायला लागली. त्यामुळे रोहितला मैदानाबाहेर जावे लागले. त्याने मैदान सोडल्यानंतर रोहितची दुखापत कितपत गंभीर आहे? तो पुढील दोन सामने खेळू शकेल की नाही? याबाबत अनेकप्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मालिकेतील पुढील दोन सामने ६ आणि ७ ऑगस्ट रोजी फ्लोरिडामध्ये होणार आहेत.
रोहित त्याच्या फिटनेसवर काय म्हणाला?
दरम्यान, सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये रोहित शर्माने त्याच्या दुखापतीबद्दल तसेच तो पुढील सामन्यांमध्ये उपस्थित राहणार की नाही याबद्दल अपडेट दिली आहे. तो म्हणाला की, “सध्या ठीक आहे. पुढच्या सामन्यासाठी आमच्याकडे काही दिवस आहेत, आशा आहे की सर्व ठीक होईल. ”
रोहितच्या फिटनेसवर BCCI ची अपडेट-
बीसीसीआयनेही रोहित शर्माच्या दुखापतीबद्दल अपडेट दिली आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आणि म्हटले की, “टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या पाठीत क्रॅम्प आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे".
सुर्यकुमार यादव सलामीवीर म्हणून चमकला-
रोहित शर्मा मैदानाबाहेर गेल्यानंतर भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. त्यांनी १६५ धावांचा सहज पाठलाग केला आणि सामना ७ विकेटने जिंकला. आता भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. पण त्याशिवाय या सामन्यातील सर्वात सकारात्मक बाब म्हणजे सूर्यकुमार यादवने सलामीवीर म्हणून उत्तम कामगिरी केली. त्याने ४४ चेंडूत ७६ धावांची खेळी खेळली, ज्यात ८ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. त्याला या डावात श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांची साथ लाभली.