IND vs ENG: दुसरा दिवस कॅप्टन बुमराहच्या नावावर, भारताची सामन्यावर मजबूत पकड
इंग्लंडचा संघ अडचणीत सापडला आहे. त्यांच्या पहिल्या डावाची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. जसप्रीत बुमराहने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही इंग्लंडला हैराण करुन सोडले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन कसोटीत दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला आहे. इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद ८४ धावा केल्या आहेत. इंग्लंडचा संघ अजून ३३२ धावांनी पिछाडीवर आहे. त्यांचे जॉनी बेअरस्टॉ आणि बेन स्टोक्स नाबाद आहेत.
भारताने पहिल्या डावात ४१६ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ अडचणीत सापडला आहे. त्यांच्या पहिल्या डावाची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. जसप्रीत बुमराहने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही इंग्लंडला हैराण करुन सोडले. बुमराहने सलामीवीर अॅलेक्स लीझ याचा अवघ्या ६ धावांवर त्रिफळा उडवला. त्यानंतर जॅक क्रॉली यालाही बुमराहने ९ धावांवर बाद केले. त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवावा लागला. जेव्हा पुन्हा खेळ सुरू झाला त्यावेळी जो रूट आणि ओली पोप यांनी डाव सावण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हा एकदा जसप्रीत बुमराहने इंग्लंडला धक्का दिला. त्याने पोपला १० धावांवर तंबूत पाठवले. पोप बाद होताच पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे दोन तासांचा खेळ वाया गेला.
पाऊस थांबल्यानंतर खेळ पुन्हा सुरु झाला. मात्र, यावेळ मोहम्मद सिराजने जो रुटला पंत करली झेलबाद केले. इंग्लंडसाठी हा सर्वात मोठा धक्का होता. रुट ३१ धावा करुन बाद झाला. दरम्यान, भारताकडून दुसऱ्या दिवसअखेर कर्णधार जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३ गडी बाद केले आहेत.
भारताच्या पहिल्या डावात ४१६ धावा
पाचव्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने ७ बाद ३३८ धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. काल ८३ धावांवर नाबाद असलेला रविंद्र जडेजाने आज त्याच्या कसोटी कारकिर्दितले तिसरे शतक पूर्ण केले. त्याने १९३ चेंडूत १०४ धावा केल्या. जडेजा अँडरसनच्या गोलंदाजीवर बाद झाला.
त्यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहने आक्रमक फटकेबाजी करत भारताला ४०० चा टप्पा पार करून दिला. जसप्रीत बुमराहने ब्रॉडच्या एकाच षटकात ३५ धावा चोपून नवा विक्रम केला. बुमराने १६ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या. मोहम्मद सिराज बाद होणारा भारताचा शेवटचा फलंदाज ठरला.
इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या.