मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND Vs Ban: जखमी रोहित लढला पण भारत थोडक्यात हरला, बांगलादेशनं वनडे मालिका जिंकली

IND Vs Ban: जखमी रोहित लढला पण भारत थोडक्यात हरला, बांगलादेशनं वनडे मालिका जिंकली

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 07, 2022 07:59 PM IST

India Vs Bangladesh 2nd Odi highlights: भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने टीम इंडियाचा ५ धावांनी पराभव केला आहे. सोबतच बांगलादेशने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

India Vs Bangladesh 2nd Odi highlights
India Vs Bangladesh 2nd Odi highlights

भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने टीम इंडियाचा ५ धावांनी पराभव केला आहे. सोबतच बांगलादेशने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. त्यांनी ५० षटकांत ७ गडी गमावून २७१ धावा केल्या. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने ८३ चेंडूत १०० धावांची नाबाद खेळी खेळली. याशिवाय महमुदुल्लाहने ७७ धावा केल्या.

प्रत्युत्तरात भारतीय संघ ५० षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्या २६६ धावाच करू शकला. या सामन्याच्या सुरुवातीलाच रोहित शर्माला दुखापत झाली होती. क्षेत्ररक्षण करताना त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर रोहितलाही रुग्णालयात नेण्यात आले. काही वेळानंतर तो स्टेडियममध्ये परतला, पण त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला पट्टी बांधलेली होती. अशा परिस्थितीत तो क्षेत्ररक्षणासाठी उतरला नाही. तसेच सलामीला फलंदाजीसदेखील आला नाही.

रोहित शर्मा ९ व्या क्रमांकावर फलंदाजीस आला

 रोहित नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि तिथून त्याने एकट्याच्या बळावर सामना जवळपास फिरवला. बोटाला दुखापत झाल्यानंतरही रोहितने २८ चेंडूंत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ५१ धावा कुटल्या. शेवटच्या षटकात भारताला २० धावांची गरज होती. चेंडू मुस्तफिजुर रहमानच्या हातात होता आणि रोहित स्ट्राईकवर होता.

शेवटचे षटक असे होते

पहिला चेंडू- एकही धाव नाही

दुसरा चेंडू- चौकार

तिसरा चेंडू- चौकार

त्यानंतर भारताला ३ चेंडूत १२ धावांची गरज होती. पण चौथा चेंडू मुस्तफिजूर रहमानने निर्धाव टाकला.

चौथा चेंडू- निर्धाव

पाचवा चेंड- षटकार

सहावा चेंडू- एक धाव

शेवटचा चेंडू मुस्तफिझूरने यॉर्कर टाकला. अशा प्रकारे बांगलादेशचा विजय झाला. सामन्याचा टर्निंग पॉइंट ४८ वे षटक ठरले. या षटकात मोहम्मद सिराज स्ट्राइकवर होता. मात्र, मुस्तफिजून रहमानने हे षटक मेडन टाकले. या षटकात एकही धाव न मिळणे गेम चेंजर ठरले.

४८ व्या षटकात एकही धाव आली नाही

भारताला विजयासाठी शेवटच्या तीन षटकांत ४० धावांची गरज होती. ४८वे षटक मेडन गेले. त्याचवेळी ४९व्या षटकात महमुदुल्लाह गोलंदाजीसाठी आला. या षटकात टीम इंडियाने २० धावा केल्या. रोहितने २ षटकार ठोकले. त्याचवेळी ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर सिराज क्लीन बोल्ड झाला. अशाप्रकारे शेवटच्या षटकात २० धावा शिल्लक होत्या, पण टीम इंडियाला केवळ १५ धावा करता आल्या. 

रोहितशिवाय भारताकडून श्रेयस अय्यरने ८२ आणि अक्षर पटेलने ५६ धावा केल्या. बांगलादेशकडून इबादत हुसेनने ३ बळी घेतले. त्याचवेळी मेहदी हसन मिराज आणि शाकिब अल हसन यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

WhatsApp channel