IND vs AUS 3rd T20: रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव, भारतानं मालिका २-१ नं जिंकली
India Vs Australia T20i series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हैदराबादमध्ये खेळला गेला. पहिला टी-20 ऑस्ट्रेलियाने तर दुसरा टी-20 भारताने जिंकला होता. तिसऱ्या T20 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारतासमोर १८७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाने १९.५ षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले.
भारताने तिसऱ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ६ विकेट्स राखून पराभव केला. रोमहर्षक सामन्यात भारताला शेवटच्या षटकात ११ धावांची गरज होती. त्यावेळी विराट कोहली आणि हार्दिक पांड्या क्रीजवर होते. डॅनियल सॅम्स गोलंदाजी करत होता. कोहलीने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. मात्र, पुढच्याच चेंडूवर कोहली झेलबाद झाला.
दिनेश कार्तिकने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. भारताला शेवटच्या ३ चेंडूत ४ धावा हव्या होत्या. त्याचवेळी चौथ्या चेंडूवर हार्दिकला एकही धाव करता आली नाही. पाचव्या चेंडूवर सॅम्सने वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू हार्दिकच्या बॅटला लागला आणि थर्ड मॅनच्या दिशेने चौकार गेला. अशा प्रकारे भारताने एका चेंडूने विजय मिळवला.
भारताने तीन सामन्यांची T20I मालिका २-१ ने जिंकली
या विजयासह भारताने तीन सामन्यांची T20I मालिका २-१ ने जिंकली. पहिला टी-20 ऑस्ट्रेलियाने तर दुसरा टी-20 भारताने जिंकला. तिसऱ्या T20 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारतासमोर १८७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. कॅमेरून ग्रीनने २१ चेंडूत ५२ तर टीम डेव्हिडने २७ चेंडूत ५४ धावा केल्या.
प्रत्युत्तरात टीम इंडियाने १९.५ षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून सूर्यकुमार यादवने ३६ चेंडूत ६९ धावा केल्या. त्याचवेळी विराट कोहलीने ४८ चेंडूत ६३ धावांची खेळी केली.
नऊ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने भारतात टी-२० मालिका गमावली
भारतीय संघाला मायदेशात नऊ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका जिंकण्यात यश आले आहे. २०१३ नंतर ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच भारतात टी-20 मालिकेत पराभूत झाला आहे.
२०१७-१८ मधील मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली होती. तर २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियाने २-० ने विजय मिळवला होता.
ऑस्ट्रेलियाचा डाव
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज सुरूवात केली. कर्णधार फिंच आणि कॅमरुन ग्रीन जोडीने पहिल्या ३ षटकांतच षटकात ४० धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. त्यानंतर ग्रीनने आपली तुफानी खेळी सुरुच ठेवली त्याने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने ५ षटकात ६२ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र भुवनेश्वर कुमारने ग्रीनला ५२ धावांवर बाद केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावली.
ग्रीन बाद झाल्यानंतर मॅक्सवेल ६ आणि स्मिथ ९ धावा हे स्वस्तात तंबूत परतले. ऑस्ट्रेलियाच्या पाठोपाठ दोन विकेट पडल्यानंतर टीम डेव्हिड आणि जॉश इग्लिस यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी कांगारूंचे शतक धावफलकावर लावले. मात्र अक्षर पटेलने ही जोडी फोडली. इंग्लीसने २२ चेंडूत २४ धावा केल्या.
त्यानंतर डेव्हिडने डॅनियल सॅम्ससोबत ५१ धावांची भागीदार रचली आणि संघाला १८० धावांचा टप्पाा गाठून दिला. टीम डेव्हिडने २७ चेंडूत केलेल्या ५४ केल्या. या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकांत १८६ धावांपर्यंत मजल मारली.
भारताकडून अक्षर पटेलने ३३ धावांत सर्वाधिक ३ गडी बाद केले.