IND vs AUS T20: पहिला सामना ऑस्ट्रेलियाचा, मोहालीत पडला ४१९ धावांचा पाऊस
India vs Australia 1st T20i: मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताने दिलेले २०९ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ६ गडी गमावून पूर्ण केले. ३ सामन्यांच्या T20I मालिकेत भारत आता ०-१ ने पिछाडीवर आहे. या सामन्यात दोन्ही डावांमध्ये मिळून ४१९ धावांचा पाऊस पडला.
मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताने दिलेले २०९ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ६ गडी गमावून पूर्ण केले. ३ सामन्यांच्या T20I मालिकेत भारत आता ०-१ ने पिछाडीवर आहे.
मॅथ्यू वेडने ऑस्ट्रेलियासाठी शेवटच्या काही षटकांमध्ये अप्रतिम खेळी केली. त्यानेच भारताकडून सामना पूर्णपणे हिसकावून घेतला. वेडने केवळ २१ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ४५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या १८ चेंडूत ४० धावा हव्या होत्या, त्या त्यांनी वेडच्या बळावर सहज पूर्ण केल्या.
भारतीय गोलंदाजांची लाजिरवाणी कामगिरी
या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी लाजिरवाणी कामगिरी केली. टीम इंडियाचा स्ट्राईक बॉलर भुवनेश्वर कुमारने ४ ओव्हरमध्ये ५२ रन्स दिल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही. युझवेंद्र चहलच्या बाबतीतही तसेच झाले, चहलने केवळ ३.२ षटकात ४२ धावा दिल्या. तर प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या हर्षल पटेलने ४ षटकात ४९ धावा दिल्या.
कॅमरुन ग्रीनची शानदार सुरुवात
दरम्यान, २०९ धावांचा पाठलाग करताना कॅमरून ग्रीनने आक्रमक सुरुवात करुन दिली. त्याने अवघ्या ३० चेंडूत ६१ धावा केल्या. ग्रीन बाद झाल्यानंतर सामना भारताच्या बाजूने झुकला होता. मात्र, शेवटी मॅथ्यू वेडने आक्रमक फलंदाजी करत भारताला विजय मिळू दिला नाही.
तत्पूर्वी, भारताकडून हार्दिक पांड्याने शेवटच्या काही षटकांमध्ये तुफानी खेळी केली. त्याने ३० चेंडूत ७१ धावांची नाबाद खेळी खेळली. हार्दिकने आपल्या खेळीत ७ चौकार आणि ५ षटकार मारले. या खेळीच्या जोरावरच भारताने २०० धावांचा टप्पा गाठला होता.
भारताचा डाव
टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधा रोहित शर्मा ९ चेंडूत ११ धावा करून बाद झाला. यानंतर विराट कोहलीही फार काही करू शकला नाही आणि ७ चेंडूंत दोन धावा करून बाद झाला. यानंतर केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४२ चेंडूत ६८ धावांची भागीदारी केली. राहुलने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सलग दुसरे अर्धशतक आणि कारकिर्दीतील १८ वे अर्धशतक झळकावले. तो ३५ चेंडूत ५५ धावा करून बाद झाला. त्याला जोश हेझलवूडने नॅथन एलिसच्या हाती झेलबाद केले. राहुलने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ३ देखणे षटकार मारले.
राहुल बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवही २५ चेंडूत ४६ धावा करून बाद झाला. त्याला कॅमरून ग्रीनने यष्टिरक्षक मॅथ्यू वेडच्या हाती झेलबाद केले. सूर्यकुमारने आपल्या खेळीत दोन चौकार आणि ४ षटकार मारले. अक्षर पटेल (१२ धावा) आणि दिनेश कार्तिक (१६ धावा) हे फलंदाजही फार काही करू शकले नाहीत. या दोघांनाही नॅथन एलिसने पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
अखेरीस हार्दिक पंड्याने हर्षल पटेलसह टीम इंडियाची धावसंख्या २०० धावांच्या पुढे नेली. हार्दिकने ३० चेंडूत ७१ धावा केल्या तर हर्षल ४ चेंडूत ७ धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याचवेळी जोश हेझलवूडने २ गडी बाद केले. याशिवाय कॅमेरून ग्रीनला एक विकेट मिळाली.