मराठी बातम्या  /  क्रीडा  /  रोहित शर्माचे दिवस फिरले! वनडेचं कर्णधारपदही जाणार?; BCCI करतेय 'या' खेळाडूचा विचार
Rohit Sharma
Rohit Sharma

रोहित शर्माचे दिवस फिरले! वनडेचं कर्णधारपदही जाणार?; BCCI करतेय 'या' खेळाडूचा विचार

22 December 2022, 13:49 ISTGanesh Pandurang Kadam

Rohit Sharma : सततच्या असमाधानकारक कामगिरीमुळं भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे.

Hardik Pandya may Replace Rohit Sharma : मागील वर्षभरात देशांतर्गत व देशाबाहेरील स्पर्धांमध्ये भारतीय क्रिकेट संघाला समाधानकारक कामगिरी न करता आल्यानं बीसीसीआयच्या गोटात अस्वस्थता आहे. याच अस्वस्थेतून भारतीय संघात मोठे बदल करण्याचा विचार सुरू झाला आहे. त्याचा पहिला फटका भारताचा आघाडीचा फलंदाज व सध्याच्या कर्णधार रोहित शर्मा याला बसण्याची शक्यता आहे. टी-२० बरोबरच एकदिवसीय सामन्यातील त्याचं कर्णधारपदही धोक्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२०२२ मध्ये टीम इंडियाची कामगिरी फारच खराब राहिली. खासकरून मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यातही भारताला अपयश आलं. त्यानंतर झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघ इंग्लंडकडून १० विकेट्सनं पराभूत होऊन स्पर्धेबाहेर फेकला गेला. एकदिवसीय सामन्यांतही बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गमवावी लागली. त्यामुळंच बीसीसीआयनं नेतृत्व बदलाचा निर्णय घेतल्याचं समजतं. टी-२० बरोबरच एकदिवसीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पंड्याकडं सोपवण्याचा विचार सुरू आहे. तसं झाल्यास रोहित शर्माकडं केवळ कसोटी संघाचं कर्णधारपद राहणार आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेपर्यंत रोहितच एकदिवसीय संघाचं नेतृत्व करेल, असं मानलं जात होतं. मात्र, बांगलादेश विरुद्धच्या पराभवानंतर सगळी गणितं बदलली आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बीसीसीआयची या संदर्भात हार्दिक पंड्याशी चर्चा सुरू आहे. उत्तर देण्यासाठी त्यानं थोडा वेळ मागितला आहे. अद्याप याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सनं आयपीएल २०२२ चं विजेतेपद पटकावलं होतं. हार्दिकनं अलीकडच्या काळात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही बाबतीत भरीव कामगिरी केली आहे. शिवाय, आपल्या नेतृत्वगुणांनी त्यानं लोकांची मनं जिंकली आहेत. विराट कोहलीनंतर रोहित शर्माला टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती, मात्र रोहित कधी दुखापतीमुळं तर कधी काही कारणांमुळं अनेक मालिकांना अनुपस्थित राहिला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं वेगळा विचार सुरू केला आहे. नेमका निर्णय काय होतो यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.