Hardik Pandya: याला म्हणतात कॉन्फिडन्स! पाहा विजयी षटकार खेचण्याआधीची हार्दिकची ‘ती’ रिअॅक्शन
Hardik Pandya Confidence reaction: पाकिस्तानविरुद्धचा सामना हार्दिक पांड्याने षटकार ठोकून संपवला. हा विजयी षटकार ठोकण्याआधी हार्दिक पांड्याची एक रिअॅक्शन चांगलीच व्हायरल झाली आहे.
आशिया चषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने २०२१ च्या टी२० विश्वचषकातील पराभवाचा हिशेब चुकता केला आहे.
दरम्यान, अतिशय रोमहर्षक झालेला सामना हार्दिक पांड्याने षटकार ठोकून संपवला. हा विजयी षटकार ठोकण्याआधी हार्दिक पांड्याची रिअॅक्शन व्हायरल झाली आहे.
वास्तविक, रविवारी भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना सामना अखेरीस रोहमहर्षक स्थितीत पोहोचला होता. भारताला शेवटच्या दोन षटकात २१ धावा हव्या होत्या, १९व्या षटकात तीन चौकारांमुळे एकूण १४ धावा आल्या, तर शेवटच्या षटकात ७ धावांची आवश्यकता होती.
शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं
पण शेवटच्या षटकात रवींद्र जडेजा पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने सामना पुन्हा रंजक स्थितीत पोहोचला. यानंतर दिनेश कार्तिक क्रिजवर आला, त्याने पहिल्याच चेंडूवर सिंगल घेतली. त्यानंतर स्ट्राईक हार्दिक पांड्याकडे आली. हार्दिक स्ट्राईकवर येताच त्याने मोठा फटका मारला पण तो थेट फिल्डरच्या हातात गेला. त्या चेंडूवर कोणतीही धाव मिळाली नाही. यानंतर पुढील चेंडू खेळण्याच्या आधीची हार्दिक पांड्याची ही रिअॅक्शन समोर आली आहे.
ज्यामध्ये तो मान हलवून दिनेश कार्तिकला जणू हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, ‘भावा मी आहे, टेन्शन नको घेऊ’, हार्दिकचे हेच रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. लोकांनाही ती प्रचंड आवडली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी हार्दिक पांड्याच्या आत्मविश्वासाचे जोरदार कौतुक केले आणि म्हटले की, ‘यालाच हार्डकोर कॉन्फिडन्स म्हणतात’.
मॅचविनर हार्दिक पांड्या
हार्दिक पांड्या हा पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात मॅचविनर म्हणून म्हणून उदयास आला. त्याने प्रथम गोलंदाजीत तीन विकेट घेतल्या. चार षटकांच्या कोट्यात हार्दिक पांड्याने केवळ २५ धावा दिल्या आणि तीन बळी घेतले. यानंतर फलंदाजीत पांड्याने १७ चेंडूंत ४ चौकारांसह ३३ धावा केल्या. यात त्या विजयी षटकाराचाही समावेश आहे.
दरम्यान, आशिया चषक २०२२ मध्ये दोन्ही संघांचा हा पहिला सामना होता. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत १४७ धावा केल्या. पाकिस्तानसाठी फक्त मोहम्मद रिझवान ४३ धावांची मोठी खेळी खेळू शकला. तर टीम इंडियासाठी भुवनेश्वर कुमारने ४ आणि हार्दिक पंड्याने ३ विकेट घेतल्या. त्यानंतर हार्दिक पंड्याच्या ३३, विराट कोहलीच्या ३५ आणि रवींद्र जडेजाच्या ३५ धावांच्या जोरावर भारताने शेवटच्या षटकात विजयी लक्ष्य गाठले.