महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये आज (१५ फेब्रुवारी) भारताचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध होत आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी ११९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २० षटकांत ६ बाद ११८ धावा केल्या आहेत.
दरम्यान, या सामन्यात दीप्ती शर्माने भारतासाठी इतिहास रचला आहे. तिने टी-20 क्रिकेटमध्ये १०० बळी पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे, पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंमध्ये १०० बळींचा टप्पा गाठणारी ती पहिली भारतीय आहे. या सामन्यात तिने ४ षटकांत १५ धावा देत ३ बळी घेतले. ३ विकेट घेतल्यानंतर ती टी-20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली आहे. या बाबतीत तिने पूनम यादवला (९८ बळी) मागे टाकले आहे. दीप्तीने भारतासाठी आतापर्यंत ८९ टी-२० सामने खेळले आहेत. २०१६ मध्ये तिने भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
दीप्ती शर्मा ही T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० विकेट घेणारी पहिली भारतीय क्रिकेटर आहे. तिच्यापूर्वी कोणत्याही पुरुष खेळाडूलादेखील ही कामगिरी करता आलेली नाही. याआधी महिला क्रिकेटमध्ये पूनम यादवने सर्वाधिक ९८ विकेट्स घेतल्या होत्या. पुरुषांमध्ये युझवेंद्र चहलच्या नावावर ९१ आणि भुवनेश्वर कुमारच्या खात्यात ९० विकेट आहेत.
२५ वर्षीय दीप्तीच्या आधी ८ महिला गोलंदाजांनी १०० किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. वेस्ट इंडिजच्या अनिसा मोहम्मदच्या नावावर सर्वाधिक १२५ विकेट आहेत.
संबंधित बातम्या