‘CWG 2022 जगावर वर्चस्व गाजवण्याची सुवर्णसंधी’, PM मोदींनी खेळाडूंमध्ये भरला जोश
कॉमनवेल्थ गेम्स इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान होणार आहेत. गोल्ड कोस्ट येथे झालेल्या गेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत भारताने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनंतर तिसरे स्थान पटकावले होते. यावेळी संघाचा प्रयत्न हा कामगिरीत सुधारणा करण्याचा असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (२० जुलै) राष्ट्रकुल खेळ २०२२ साठी निवडलेल्या २१५ खेळाडूंशी संवाद साधला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा संवाद झाला. मोदींनी भारतीय खेळाडूंना शानदार खेळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रकुल स्पर्धा ही जगावर अधिराज्य गाजवण्याची सुवर्णसंधी असल्याचे मोदी म्हणाले. तसेच, कोणाला घाबरू नका, असे सांगत 'कोई नहीं है टक्कर में, कहां पड़े हो चक्कर में'. या म्हणीचा दाखला दिला.
वडिलांसोबत सायकलवर हॉकी पाहायला जायचे- सलीमा टेटे
यावेळी झारखंडची महिला हॉकीपटू सलीमा टेटे हिने मोदींना सांगितले की, ‘माझे वडीलही हॉकी खेळायचे. मी त्यांच्यासोबत सायकलवरून खेळ पाहायला जायचे. तिथूनच मला या खेळाची प्रेरणा मिळाली. त्यानंतर मला समजले की जीवनात काहीही साध्य करण्यासाठी संघर्ष आवश्यक आहे’.
दरम्यान, मोदींनी पहिल्यांदा स्टीपलचेस खेळाडू अविनाश साबळे याच्याशी संवाद साधला. महाराष्ट्रातील बीडचा अविनाश २०१२ मध्ये लष्करात भरती झाला. चार वर्षांच्या सामान्य कर्तव्यानंतर त्याची स्टीपल चेससाठी निवड करण्यात आली.
खेळाचे हे नवे पर्व
‘तुम्ही परत याल तेव्हा आपण एकत्र मोठा उत्सव साजरा करू, असे वचनही पीएम मोदींनी यावेळी दिले. आपल्या देशातील खेळाचे हे नवे पर्व आहे. तुम्ही सर्व छान करत आहात. आपल्याकडे उत्तम खेळाडू आहेत. प्रशिक्षणही चांगले सुरू आहे. यावेळी आपल्याकडे कॉमनवेल्थ संघात अनुभवी आणि तरुण उर्जेचा समावेश आहे. तुम्ही न्यू इंडियाचे प्रतिनिधित्व करत आहात. भारताचा प्रत्येक कानाकोपरा प्रतिभावान खेळाडूंनी भरलेला आहे हे तुम्ही सिद्ध केले आहे’, असेही मोदी म्हणाले.
२८ जुलैपासून कॉमनवेल्थ गेम्सला सुरुवात-
यावेळचे कॉमनवेल्थ गेम्स इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान होणार आहेत. गोल्ड कोस्ट येथे झालेल्या गेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत भारताने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनंतर तिसरे स्थान पटकावले होते. यावेळी संघाचा प्रयत्न कामगिरीत सुधारणा करण्याचा असेल.
बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ३२२ सदस्यीय भारतीय संघ आधीच जाहीर करण्यात आला आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) या संघात २१५ खेळाडूंचा समावेश केला आहे, तर १०७ अधिकारी आणि सहाय्यक कर्मचारी आहेत.
नीरज चोप्रावर खास नजर-
संघातील काही प्रमुख नावांमध्ये ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, पीव्ही सिंधू, मीराबाई चानू, लोव्हलिना बोरगोहेन, बजरंग पुनिया आणि रवी कुमार दहिया यांचा समावेश आहे. याशिवाय, विद्यमान राष्ट्रकुल चॅम्पियन मनिका बत्रा, विनेश फोगट तसेच २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते तजिंदरपाल सिंग तूर, हिमा दास आणि अमित पंघल हे देखील या संघाचे भाग आहेत.
भारतीय खेळाडू १९ खेळांमध्ये सहभागी होणार-
भारतीय बॉक्सिंग फेडरेशन (BFI) चे उपाध्यक्ष राजेश भंडारी हे संघाचे शेफ डी मिशन (टीम चीफ) आहेत. भारतीय खेळाडू १५ खेळांमध्ये आणि ४ पॅरा स्पोर्ट्समध्ये भाग घेतील. बॉक्सिंग, बॅडमिंटन, हॉकी, वेटलिफ्टिंग, महिला क्रिकेट आणि कुस्ती या खेळांमध्ये संघाकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे.
यावेळी महिला क्रिकेटचाही समावेश-
महिला क्रिकेट (T20 फॉरमॅट) प्रथमच या खेळांचा भाग बनला आहे. काही भारतीय खेळाडू आधीच बर्मिंगहॅमला पोहोचले आहेत, तर काही जागतिक स्पर्धांमध्ये भाग घेतल्यानंतर थेट तिथे पोहोचतील. उर्वरित खेळाडू नवी दिल्लीहून रवाना होतील. कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेज अधिकृतपणे २३ जुलै रोजी सर्व संघांसाठी खुले होणार आहे. तर भारतीय संघ पाच वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करणार आहे.
विभाग