मराठी बातम्या  /  क्रीडा  /  धक्कादायक! ‘विराटला एक टेस्ट खेळवा अन् खात्री करा…’, दिग्गजाचं ट्वीट व्हायरल

धक्कादायक! ‘विराटला एक टेस्ट खेळवा अन् खात्री करा…’, दिग्गजाचं ट्वीट व्हायरल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 21, 2022 08:05 PM IST

गेल्या ११ वर्षांमध्ये विराट कोहलीने (virat kohli) कर्णधारपद आणि फलंदाजीत शानदार कामगिरी केली आहे. २०१४ च्या अखेरीस तो टीम इंडियाचा (team india) कसोटी कर्णधार बनला होता. एमएस धोनीच्या (ms dhoni) जागी त्याची भारताचा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

virat kohli
virat kohli

टीम इंडियाचा (team india) माजी कर्णधार विराट कोहलीने (virat kohli) नुकतीच कसोटी क्रिकेट करिअरची ११ वर्षे पुर्ण केली आहेत. यानंतर त्याने आपल्या करिअरचा एक शानदार व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला होता. विराटचे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधले प्रदर्शन हे अतिशय देखणे राहिले आहे.

दरम्यान, अशातच विराट कोहलीविषयीचे एक ट्वीट प्रचंड व्हायरल होत आहे. हे ट्वीट कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांनी २०१२ मध्ये केले होते. त्या ट्वीटमध्ये विराटच्या कसोटी क्रिकेट खेळण्याच्या गुणवत्तेवर प्रश्चचिन्ह निर्माण करण्यात आला होता.

विराट कोहलीने २०११ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. त्यानंतर त्याची वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड झाली होती. विराटने सबिना पार्कवर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, विराटची कसोटी क्रिकेटमधील कारकिर्दीची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. मात्र, पहिल्याच सामन्यात कोहली पूर्णपणे फ्लॉप ठरला. सबिना पार्क मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध पहिली कसोटी खेळताना विराटने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात १५ धावा केल्या होत्या. त्याला दोन्ही डावात वेगवान गोलंदाज फिडेल एडवर्ड्सने बाद केले होते.

त्यानंतर संजय मांजरेकरांनी यांनी एक ट्वीट केले होते. या ट्वीट मध्ये ते म्हणाले होते की, "मी आता लक्ष्मणला ड्रॉप करुन रोहितला पुढच्या सामन्यात संधी देऊ इच्छितो. लॉंग टर्मसाठी हे योग्य ठरेल. तसेच, विराटला आणखी एक टेस्ट खेळवा अन् खात्री करा की तो टेस्ट खेळू शकतो का"? हे १० वर्षांपूर्वीचे ट्वीट आता व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे, आता ११ वर्षांनंतर विराट कोहली देशातील सर्वोत्तम कसोटी फलंदाजांपैकी एक आहे. विराटने आतापर्यंत कसोटीत ७ हजार ४३ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर १०१ कसोटी सामन्यांमध्ये २७ शतके आणि २८ अर्धशतके जमा आहेत.

तसेच, या ११ वर्षांमध्ये विराट कोहलीने कर्णधारपद आणि फलंदाजीत शानदार कामगिरी केली आहे. २०१४ च्या अखेरीस तो टीम इंडियाचा कसोटी कर्णधार बनला होता. एमएस धोनीच्या जागी त्याची भारताचा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर तो देशाचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार असल्याचे सिद्ध झाले. विराटने ६८ कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. यात ४० सामने जिंकले असून १७ गमावले आहेत. विराट हा सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा भारतीय कर्णधार आहे.

WhatsApp channel