रोहित-विराटची ‘ही’ चुक महागात पडणार, BCCI संतापले; खेळाडूंना इशारा
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी गेल्या आठवड्यात लीसेस्टर आणि लंडनमध्ये चाहत्यांसोबत सेल्फी घेतली, जिथे भारतीय संघ लीसेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबविरुद्धच्या सराव सामन्याची तयारी करत आहे.
इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी सामना खेळण्यापूर्वीच भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तो इंग्लंडला जाऊ शकलेला नाही.
मात्र, टीम इंडिया काही दिवसांपूर्वी इंग्लंडला पोहोचली आहे. त्यानंतर काही तासांतच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामध्ये दोघेही इंग्लंडमध्ये फिरताना दिसत आहेत. तसेच, चाहत्यांसोबत सेल्फीही घेत आहेत.
रोहित आणि विराटच्या या कृतीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आता चांगलेच संतापले आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत, अशात रोहित आणि विराटचे हे कृत्य बोर्डाला बेजबाबदारपणाचे वाटत आहे. मालिकेदरम्यान, खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, असे BCCI ला वाटत आहे.
रोहित आणि विराटच्या या चुकीनंतर दोघांनाही क्रिकेट बोर्डाकडून इशारा मिळाला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी गेल्या आठवड्यात लीसेस्टर आणि लंडनमध्ये चाहत्यांसोबत सेल्फी घेतली होती, जिथे भारतीय संघ लीसेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबविरुद्धच्या सराव सामन्याची तयारी करत आहे. रोहित आणि विराटने मास्क न घालता शॉपिंग केल्याचेही वृत्त तिथे आले होते.
यानंतर बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी या घटनेला गांभिर्याने घेतले आहे. त्यांनी सांगितले की 'कोरोनाचा धोका अजूनही आहे. त्यामुळे इंग्लडमध्ये भारतीय खेळाडूंनी काळजी घ्यावी, आम्ही सर्व खेळाडूंना सावध राहण्याचे आवाहन करत आहोत".
ब्रिटनमध्ये कोविड-१९ चे रुग्ण अजूनही खूप जास्त आहेत. देशात दररोज १० हजारांहून अधिक नवीन रुग्ण नोंदवली जात आहेत. रोहित आणि विराटची ही चूक त्यांना पाच दिवसांसाठी अलगीकरणात ठेवू शकते. तसेच, ते यामुळे एकमेव एजबॅस्टन कसोटीतूनही बाहेर होऊ शकतात.
दरम्यान, कसोटीपूर्वी टीम इंडिया ४ दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. यामुळे भारतीय संघाला तेथील परिस्थीचा अंदाज येईल. १७ सदस्यीय संघातील सर्व खेळाडू इंग्लंडला पोहोचले आहेत. आता फक्त अश्विन उरला आहे, त्याला कोरोनाचा फटका बसला आहे. मात्र, तो वेळेत बरा होईल आणि १ ते ५ जुलै दरम्यान होणाऱ्या पाचव्या कसोटीसाठी उपलब्ध होईल, अशी आशा संघ व्यवस्थापनाला आहे.