IND vs AUS Highlights : भारतीय वाघ झाम्पा-एगरच्या फिरकीत अडकले, ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका जिंकली
AUS Vs IND 3rd odi highlights : ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका जिंकली आहे. शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा २१ धावांनी पराभव केला. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. अशा प्रकारने ऑस्ट्रेलियाने ३ वनडे सामन्यांची मालिका २-१ अशी खिशात घातली.
IND vs AUS, 3rd ODI- Full Match Highlights : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी जिंकला आहे. यासह कांगारू संघाने मालिकाही २-१ अशी जिंकली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २७० धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडिया २४८ धावांवर गडगडली आणि सामना गमावला.
२७० धावांचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली आणि विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे सामना जिंकण्याच्या जवळ पोहोचला, पण अखेरीस भारताने लागोपाठ विकेट गमावल्या आणि संपूर्ण संघ २४८ धावांवर गारद झाला.
ऑस्ट्रेलियाकडून लेगस्पिनर अॅडम जम्पाने ४ तर अॅश्टन एगरने २ बळी घेतले.
रोहित-गिलची शानदार सुरुवात
२७० धावांच्या प्रत्युत्तरात कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. रोहित ३० धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर झेलबाद झाला. त्यानंतर काही वेळातच ३७ धावांची इनिंग खेळून शुभमन गिलही बाद झाला.
७७ च्या स्कोअरवर २ गडी गमावल्यानंतर भारतीय संघाचा डाव विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी सांभाळला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९३ चेंडूत ६९ धावांची भागीदारी करत संघाला चांगल्या स्थितीत नेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी ३२ धावांची इनिंग खेळल्यानंतर अॅडम झाम्पाच्या चेंडूवर राहुल पॅव्हेलियनमध्ये परतला.
अर्धशतकानंतर विराट बाद
यानंतर विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील ६५वे अर्धशतक पूर्ण केले परंतु टीम इंडिया ठराविक अंतराने विकेट गमावत राहिली. कोहली ५४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर सूर्यकुमार यादवला पुन्हा एकदा शुन्यावर बाद झाला. १८५ च्या धावसंख्येपर्यंत भारतीय संघाने आपले ६ महत्त्वाचे विकेट गमावले होते.
येथून हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजाने संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला, मात्र हार्दिकही ४० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सरतेशेवटी, मोहम्मद शमीने १४ धावांची खेळी केली पण ती संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपुरी ठरली. यानंतर भारतीय संघाचा डाव २४८ धावांवर आटोपला.
ऑस्ट्रेलियाचा डाव
टॉस जिंकून प्रथम फलंदाजीस आलेल्या ऑसी सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श या जोडीने चांगली सुरुवात केली. या दोघांनी पॉवरप्लेमध्ये ६१ धावांची भर घातली. मात्र, हेड ३३ धावा करून हार्दिकचा बळी ठरला. यानंतर हार्दिकने स्टीव्ह स्मिथला खातेही उघडू दिले नाही आणि मार्शला ४७ धावांवर बाद केले. १७ धावांच्या अंतरावर तीन विकेट गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ बॅकफूटवर गेला.
यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लॅबुशेन यांनी चौथ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली, मात्र कुलदीप यादवने दोघांनाही बाद करून सामन्यावर भारताची पकड मजबूत केली. मार्कस स्टॉइनिस आणि अॅलेक्स कॅरी यांनी सहाव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली, मात्र अक्षरने २५ धावांवर स्टॉइनिसला झेलबाद केले. यानंतर कुलदीपने शानदार चेंडूवर कॅरीला बाद केले. कॅरीने ३८ धावा केल्या.
अॅबॉटने २६ , अगर १७ आणि स्टार्क-जम्पाने १०-१० धावांचे योगदान देत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २६९ धावांपर्यंत नेली. भारताकडून हार्दिक आणि कुलदीपने प्रत्येकी तीन, तर अक्षर पटेल आणि सिराजने प्रत्येकी दोन बळी घेतले.