मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदी आशिया चषकातून बाहेर? बाबर आझमनं स्पष्टच सांगितलं

Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदी आशिया चषकातून बाहेर? बाबर आझमनं स्पष्टच सांगितलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 13, 2022 12:17 PM IST

Shaheen Afridi Injury: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे आशिया चषकात त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. टीम इंडियाचा जसप्रीत बुमराहदेखील दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर झाला आहे.

Shaheen Afridi
Shaheen Afridi

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) गेल्या आठवड्यात आशिया कप टी-२० स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली. या संघात वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीलाही ठेवण्यात आले होते. मात्र, तो स्पर्धेच्या आधीच जखमी झाला आहे. यामुळेच आता त्याच्या खेळाबाबत शंका निर्माण झाली आहे. 

या महिन्याच्या सुरुवातीलाच श्रीलंकेविरुद्ध खेळताना शाहीनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. तो अजूनही अनफिट आहे. त्याचवेळी २७ ऑगस्टपासून आशिया कपला सुरुवात होत आहे. पाकिस्तान संघ २८ ऑगस्ट रोजी दुबईत भारताविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.

मात्र, दुखापतीने ग्रस्त असूनही शाहीन पाकिस्तान संघासोबत नेदरलँड दौऱ्यावर जात आहे. मात्र, 'संघाचे डॉक्टर आणि फिजिओ वेगवान गोलंदाजांची काळजी घेत आहेत." से संघाचा कर्णधार बाबर आझमने सांगितले आहे. तसेच, शाहीन खेळणार की नाही हा निर्णय संघ व्यवस्थापन घेईल, असेही बाबर म्हणाला.

T20 वर्ल्ड कपमध्ये शाहीनने उडवला होता भारतीय फलंदाजांचा धुव्वा

भारत आणि पाकिस्तान गेल्या वेळी T20 वर्ल्ड कपमध्ये आमने-सामने आले होते. त्या सामन्यात टीम इंडियाचा १० विकेट्सनी पराभव झाला होता. त्या सामन्यात शाहीनने भारतीय संघाचा धुव्वा उडवला होता. शाहीनने टॉप-३ फलंदाज रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहलीला आपला बकरा बनवले होते.

सलमान बटची पीसीबीवर टीका-

पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटने यावर आपले मत मांडले असून आशिया चषकात शाहीनची अनुपस्थिती पाकिस्तानसाठी अडचणीत येऊ शकते असे म्हटले आहे. तसेच, “शाहीनला विश्रांती द्यावी यासाठी मी पीसीबीला सातत्याने आवाहन करत आहे, पण माझे कोणीही ऐकत नाही”. शाहीनचा प्रत्येक सामन्यात समावेश करणे महागात पडल्याचे सलमान बटने म्हटले आहे.

बटने शाहीनची तुलना भारताच्या जसप्रीत बुमराहशी तुलना केली. वास्तविक, बुमराह देखील पाठीच्या दुखापतीमुळे आशिया चषकात टीम इंडियाचा भाग असणार नाही. 

टीम इंडियाचा जसप्रीत बुमराह आशिया चषकातून बाहेर-

टीम इंडियाचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीमुळे आशिया कप खेळणार नाहीत. सध्या ते बंगळुरू येथील एनसीएमध्ये आहेत. बुमराह आशिया कपमधून तर बाहेर पडलाच आहे. मात्र, २०२२ च्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही त्याच्या खेळण्यावर सस्पेंस निर्माण झाला आहे. कारण बुमराहच्या दुखापतीने आता गंभीर रुप धारण केले आहे. जर जसप्रीत बुमराह टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला तर टीम इंडियासाठी हा सर्वात मोठा धक्का असणार आहे.

जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत, आशिया चषक स्पर्धेत भारतीय गोलंदाजी सामान्य दिसत आहे. भुवनेश्वर कुमारशिवाय संघात दुसरा अनुभवी वेगवान गोलंदाज नाही. अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांनी संघात स्थान मिळवले आहे. पण त्यांना अनुभव कमी आहे. हर्षल पटेलची देखील दुखापतीमुळे आशिया कपच्या संघात निवड झालेली नाही.

WhatsApp channel