मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Asia Cup 2022: ‘आशिया चषक जिंकण्यासाठी असतो, प्रयोगासाठी नाही’, रोहित-द्रविडवर 'या' दिग्गजाची टीका

Asia Cup 2022: ‘आशिया चषक जिंकण्यासाठी असतो, प्रयोगासाठी नाही’, रोहित-द्रविडवर 'या' दिग्गजाची टीका

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 11, 2022 07:33 PM IST

dileep vengsarkar on rahul dravid & rohit sharma: आशिया चषक २०२२ मध्ये टीम इंडियाची कामगिरी खूपच खराब होती. माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी आता संघ व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. "आशिया कप, विश्वचषक यांसारख्या स्पर्धा जिंकण्यासाठी असतात, ना की वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी”, असे वेंगसरकर म्हणाले आहेत.

Asia Cup 2022
Asia Cup 2022

आशिया चषक २०२२ मध्ये भारतीय संघाची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली. टीम इंडिया सुपर-४ स्टेजमधूनच बाहेर पडली. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या सततच्या प्रयोगांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनीही टीम इंडियाच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

दिलीप वेंगसरकर यांनी म्हटले आहे की, “टीम अजूनही प्रयोग करत आहे. दिनेश कार्तिकची संघात निवड झाली, पण त्याला खेळायला दिले नाही. रविचंद्रन अश्विनलाही कमी संधी देण्यात आली”.

आशिया कप, विश्वचषक या स्पर्धा जिंकण्यासाठी असतात- वेंगसरकर

सोबतच वेंगसरकर पुढे म्हणाले की, “आशिया कप ही खूप मोठी स्पर्धा आहे. अशा स्पर्धांमध्ये सामने जिंकणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही कोणत्याही द्विपक्षीय मालिकेत प्रयोग शकता, पण आशिया कप, विश्वचषक यांसारख्या स्पर्धा या जिंकण्यासाठी असतात ना की वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी”.

विशेष म्हणजे आशिया चषक स्पर्धेतील सुपर-४ टप्प्यात टीम इंडियाला केवळ एकच सामना जिंकता आला. या फेरीत पाकिस्तानने भारताचा ५ विकेट्सने तर श्रीलंकेचा ६ विकेटने पराभव केला. सलग दोन सामने गमावल्यानंतर टीम इंडिया आशिया कप फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडली. मात्र, अखेर त्यांनी अफगाणिस्तानवर १०१ धावांनी विजय मिळवला.

टी-20 विश्वचषकापूर्वी संघात सतत बदल

टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. कधी एका मालिकेसाठी कर्णधार बदलण्यात आला तर अनेक सलामीच्या जोडी बदलण्यात आल्या आहेत. यामुळेच तज्ज्ञांनी देखील सातत्याने होत असलेल्या बदलांची खिल्ली उडवली होती. राहुल द्रविड प्रशिक्षकपदी विराजमान झाल्यानंतर टीम इंडियाने ईशान किशन, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, दीपक हुडा या खेळाडूंना सलामीवीर म्हणून संधी दिली आहे.

वर्ल्डकपसाठी लवकरच संघाची घोषणा

टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपसाठी सज्ज आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात विश्वचषक होणार असून त्यापूर्वी लवकरच संघाची घोषणा होऊ शकते. अशा परिस्थितीत विश्वचषक संघात कोणत्या खेळाडूंना स्थान मिळते हे पाहणे बाकी आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या