Virat Kohli: श्रीलंकेच्या कोचनं केला किंग कोहलीचा गेम, '4 A' चा सिग्नल अन् विराट क्लीन बोल्ड
Virat Kohli vs Sri lanka chris silverwood: आशिया चषकात यापूर्वीच्या सलग तीन सामन्यांमध्ये चांगला खेळ दाखवणारा कोहली या सामन्यात शुन्यावर बाद झाला. कोहलीला नवखा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाने क्लीन बोल्ड केले.
टीम इंडियाचा आशिया कप २०२२ मधील प्रवास जवळपास संपला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाला फायनल गाठणे फार कठीण झाले आहे. यासाठी टीम इंडियाला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ शेवटच्या षटकात पराभूत झाला.
या स्पर्धेतील यापूर्वीच्या सलग तीन सामन्यांमध्ये चांगला खेळ दाखवणारा कोहली या सामन्यात शुन्यावर बाद झाला. कोहलीला नवखा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाने क्लीन बोल्ड केले.
सिल्व्हरवूड यांनी केला विराटचा गेम
विशेष बाब म्हणजे, कोहलीला बाद करण्यात श्रीलंकेचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. खरं तर, कोहली जेव्हा स्ट्राइकवर आला तेव्हा सिल्व्हरवुड यांनी ड्रेसिंग रूममधून एक कार्ड दाखवले होते. ज्यावर 4-A असे लिहिले होते. सिल्व्हरवुड यांचा प्लॅन यशस्वी झाला आणि विराट कोहली शून्यावर बाद झाला. सिल्व्हरवुड यांच्यासोबत कम्प्युटर विश्लेषक प्रद नवरत्नम देखील नेहमी ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित असतो. तो या कामात सिल्व्हरवुड यांना मदत करतो.
श्रीलंकेचे प्रशिक्षक सिल्व्हरवुड यांनी बांगलादेश आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्येही 2D, D5, A2, C4, D अशा कोड वर्ड्सचा वापर केला होता. तर विराट कोहलीबाबत सिल्व्हरवुड यांनी 4A कोड वापरला होता. या कोडवर्ड्सचा नेमका अर्थ काय आहे, हे कोणालाच माहीत नाही. इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक असतानाही सिल्व्हरवुड असे कोडवर्ड्स वापरायचे. त्यावेळी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने सिल्व्हरवूड यांच्यावर टीका केली होती.
असा झाला भारत-श्रीलंका सामना
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. भारताच्या दोन विकेट लवकर गेल्या. यानंतर रोहित आणि सूर्यकुमार यादव यांनी ९७ धावांची भागीदारी करत भारतीय डाव सावरला. रोहितने सर्वाधिक ७२ धावा केल्या. या बळावरच भारताने २० षटकांत आठ गडी गमावून १७३ धावा केल्या.
प्रत्युत्तरात पथुम निसांका (५२ धावा) आणि कुसल मेंडिस (५७ धावा) यांनी श्रीलंकेला ९७ धावांची भागीदारी करून शानदार सुरुवात करून दिली. मात्र, त्यानंतर श्रीलंकेच्या संघाने ठराविक अंतराने विकेट गमावल्याने त्यांची धावसंख्या चार बाद ११० अशी झाली. अशा स्थितीत भारत हा सामना जिंकू शकेल असे वाटत होते, मात्र दासून शनाका (३३) आणि राजपक्षे (२५) यांच्या शानदार फलंदाजीने भारताकडून सामना हिरावून घेतला.