Kamda Ekadashi : का सर्वात महत्वाची मानली जाते कामदा एकादशी?, काय सांगतं विष्णू पुराण?
Kamda Ekadashi Katha : असं म्हणतात की कामदा एकादशीचं व्रत ठेवणाऱ्याला एकाच व्रताने कित्येक पटींनी जास्त पुण्य मिळतं. प्रेत योनीतून मुक्ती मिळून मनुष्यासाठी स्वर्गाचे दरवाजे या व्रताने उघडतात, इतकी या व्रताची महीमा पुराणात सांगण्यात आली आहे.
येत्या १ एप्रिल २०२३ रोजी कामदा एकादशीचं व्रत ठेवलं जाणार आहे. कामदा एकादशीचं व्रत अत्यंत पवित्र मानलं जातं. असं म्हणतात की कामदा एकादशीचं व्रत ठेवणाऱ्याला एकाच व्रताने कित्येक पटींनी जास्त पुण्य मिळतं. प्रेत योनीतून मुक्ती मिळून मनुष्यासाठी स्वर्गाचे दरवाजे या व्रताने उघडतात, इतकी या व्रताची महीमा पुराणात सांगण्यात आली आहे. नेमकी या व्रतामागची कहाणी काय आहे हे आपण आज पाहाणार आहोत.
ट्रेंडिंग न्यूज
काय आहे कामदा एकादशीची कथा
प्राचीन काळी भोगीपूर नावाचे नगर होते, तेथे पुंडरिक नावाचा राजा राज्य करत असे. हे शहर खूप आनंदी होते. या नगरीत अनेक अप्सरा, किन्नर आणि गंधर्व वास्तव्यास होते असे म्हणतात. त्यांच्यात ललिता आणि ललित यांच्यात खूप स्नेह होता, दोघेही अतिशय आलिशान घरात राहत होते.
एके दिवशी गंधर्व ललित दरबारात गात होते. गाताना त्यांना अचानक त्यांची पत्नी ललिताची आठवण झाली. आपल्या पत्नीच्या आठवणीत ललित इतके व्याकूळ झाले की आपण दरबारात गात आहोत हेही ते विसरले आणि सहाजिकच त्याचा परिणाम त्यांचा गाण्यावर झाला. गाण्याचे सूर बिघडू लागले. करकट नावाच्या सापाला हे समजलं आणि त्याने ही गोष्ट राजाला सांगितली. राजा रागावला आणि त्याने ललितला तू राक्षस होशील असा शाप दिला.
ही गोष्ट ललितची पत्नी ललिता हिला कळली आणि तिला फार वाईट वाटलं. आपल्या पतीला वाचवण्याचा विचार ललिता करू लागली. ती शृंगी ऋषींच्या आश्रमात गेली आणि प्रार्थना करू लागली. शृंगी ऋषी म्हणाले की हे गंधर्व कन्ये ! तू कोण आहेस आणि इथे का आली आहेस? तेव्हा ललिताने स्वतःबद्दलची सर्व माहिती ऋषींना दिली आणि पतीच्या उद्धारासाठी उपाय विचारला.
ऋषी म्हणाले की आता चैत्र शुक्ल एकादशी येणार आहे, जिचे नाव कामदा एकादशी आहे. कामदा एकादशीचे व्रत करून त्या एकादशीचं पुण्य पतीला अर्पण केल्यास तो असुर योनीपासून मुक्त होईल. ललिताने ऋषींच्या आज्ञेचं पालन केले आणि एकादशी व्रताचे फळ मिळताच तिचा पती राक्षस योनीतून मुक्त झाला आणि त्याचे जुने रूप पुन्हा प्राप्त झाले.
त्यानंतर हे दोघं पुन्हा एकदा आनंदाने राहू लागले. विष्णू पुराणात या कथेचा संदर्भ पाहायला मिळतो. ही गोष्ट वशिष्ठ ऋषींनी राजा दिलीप यांच्या विनंतीवरुन सांगितली होती आणि युधिष्ठीराच्या विनंतीवरुन हीच कहाणी श्रीकृष्णाने युधिष्ठीराला सांगितली होती.