देशामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई असे अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. हे लोक मंदिर, दर्गाह, गिरिजाघर, चर्च अशा धार्मिक ठिकाणांना मनोभावाने भेटी देत असतात. प्रत्येक व्यक्तीला एकमेकांच्या धर्माबाबत आदर आणि कुतुहूल असते. प्रत्येक धर्मामध्ये अशी काही ठिकाणे असतात जिथे अगदी आगळ्यावेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. आणि या गोष्टींमागे एक धार्मिक महत्व असते. या गोष्टीला अनुसरुन आज आपण एक अशी दर्गा पाहणार आहोत जिथे लोक चादर नव्हे तर झाडू घेऊन दर्शनाला येतात.
राजस्थानमधील बाडमेर येथील ढेर बाबांच्या दर्ग्यामध्ये ही प्रथा दिसून येते. ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु याठिकाणी येणारे भक्त दर्गेमध्ये चादर नव्हे तर झाडू अर्पण करतात. असे केल्याने आपले दुःख दूर होत असल्याचे म्हटले जाते. ढेर बाबांची दर्गा तब्बल ४०० वर्षे जुनी आहे. इतिहासानुसार त्याकाळात बाडमेर हे खूप छोटे शहर होते. त्याठिकाणी जवळपास घरे अजिबात नव्हती. आणि त्याच ठिकाणी एक 'वली'(विद्वान) राहायचे. त्यांच्या घराजवळ कचऱ्याचे ढीग होते. त्यांनी लोकांना तो कचरा हटवण्यास सांगितले. असे करत करत लोकांनी कचरा हटवण्यास सुरुवात केली आणि त्याठिकाणी झाडू अर्पण करण्याची प्रथा रूढ झाली. सुरुवातील येईल तो व्यक्ती त्याठिकाणी झाडू सोबत घेऊन येत असे.
माहितीनुसार त्याठिकाणी लोकांनी इतक्या झाडू अर्पण केल्या की, नवीन येणारा व्यक्ती झाडूंचा ढीग असलेली दर्गा कुठे आहे असे विचारत असत. ही दर्गा दिवसेंदिवस प्रचंड लोकप्रिय बनली होती. आज ४०० वर्षानंतरही या दर्गेचे महत्व कायम आहे. आजही लोक तितक्याच भक्तिभावाने या दर्गेत आपली फिर्याद घेऊन जातात. आणि ढेर बाबांच्या चरणात नतमस्तक होतात. याठिकाणी जाऊन झाडू अर्पण करुन आल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत असल्याची मान्यता आहे.
बाडमेर मधील स्थानिक लोकांच्या मते झाडू परिसराच्या स्वच्छतेसोबतच मनुष्याच्या शाररिक रोगांनादेखील दूर लोटते. त्वचेसंबंधी असलेले विविध रोज झाडू चढवल्याने दूर होतात अशी मान्यता आहे.लोक आपल्या सुखी आणि निरोगी आयुष्यासाठी झाडू अर्पण करुन मन्नतदेखील मागतात. तर अनेक लोक मन्नत पूर्ण होताच दर्गेत येऊन झाडू अर्पण करतात. त्यामुळे याठिकाणी नेहमीच झाडूंचा ढीग पाहायला मिळतो.
विशेष म्हणजे या दर्गेत केवळ मुस्लिम बांधवच येतात असे नाही. तर या ठिकाणी प्रत्येक जाती धर्माचे बांधव श्रद्धेने येतात आणि आपल्या इच्छा प्रकट करतात. याठिकाणी दररोज भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते. देशभरात अशा अनेक दर्गा आहेत जिथे अनोख्या प्रथा रुढ आहेत. आणि त्यामागे विशेष धार्मिक महत्वदेखील आहे.
संबंधित बातम्या