Hartalika 2023 : आज हरतालिका! कशासाठी करतात हे व्रत? काय आहे त्यामागची कथा?
Hartalika vrat katha puja vidhi : आज घरोघरी हरतालिका आहे. हे व्रत का साजरा करतात, काय आहे त्यामागची पौराणिक कथा? जाणून घेऊया!
Hartalika vrat 2023 : हरतालिका हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. देशाच्या अनेक राज्यांत हरलातिका व्रत भक्तिभावानं केलं जातं. भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयात हे व्रत केलं जातं. यंदा १८ सप्टेंबर २०२३ रोजी, म्हणजेच आज हे व्रत आहे. त्या निमित्तानं घराघरांत माता
ट्रेंडिंग न्यूज
कुमारीका किंवा पतिव्रता स्त्रिया हे व्रत करतात. विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी तर, कुमारिका चांगला जोडीदार किंवा आपल्या मनासारखा पती मिळावा यासाठी या व्रताचं पालन करतात. देवी पार्वतीनं भगवान शंकरासोबत विवाह करण्यासाठी हे व्रत केलं होतं, असं म्हणतात.
हरतालिका व्रताची कथा
हिमालयाचा राजा हिमवान याची पार्वती ही कन्या. पर्वताची कन्या म्हणून तिचं नाव पार्वती असं ठेवण्यात आलं. तिचे लग्न कोणाबरोबर करावे या चिंतेनं हिमवानाला ग्रासलं होतं. एकदा नारदमुनी हिमवानाकडं आले आणि त्याला म्हणाले तुझ्या मुलीला मागणी घालण्यासाठी भगवान विष्णूंनी मला तुझ्याकडं पाठविलं आहे. हे ऐकून हिमवानाला आनंद झाला. त्यानं पार्वतीला ती बातमी सांगितली. पित्याला लग्नासाठी नकार देण्याचं धैर्य तिला झालं नाही म्हणून तिनं आपल्या मैत्रिणींबरोबर पित्याला निरोप पाठवला की जर तुम्ही माझा दुसऱ्या कोणाबरोबरही विवाह करून दिला तर मी जीव देईन. त्यानंतर पार्वती आपल्या मैत्रिणींसह अरण्यात निघून गेली.
‘तिथं तिनं कठोर तपश्चर्या केली आणि वाळूचं शिवलिंग तयार करून ती त्याची पूजा करू लागली. त्यावेळी पार्वती फक्त झाडाची कोवळी पाने खात असे, पण पुढं तिनं तेही सोडून दिलं. तिची ही तपश्चर्या पाहून भगवान श्री शिवशंकर तिच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागायला सांगितला. ती म्हणाली तुम्ही माझ्या तपश्चर्येमुळं खरोखर प्रसन्न झाला असाल तर माझे पती व्हा. शंकर भगवान 'तथास्तु’ बोलून तिथून निघून गेले.
पार्वतीचा शोध घेत हिमवान त्या अरण्यात आला. तिला त्यानं घर सोडून येण्याचं आणि तपश्चर्येचं कारण विचारलं. तेव्हा तिनं आपला दृढ निश्चय आपल्या वडिलांना सांगितला. भगवान श्रीशंकरांनी दिलेला वरही सांगितला. तिची ही श्री शंकरावरची श्रद्धा आणि प्रेम पाहून हिमवानानं तिचा विवाह भगवान श्री शंकराशी करून दिला.
पती शंकराची प्राप्ती पार्वतीनं कडक तपश्चर्येनं केली होती. त्याचप्रमाणे मनासारखा पती मिळावा म्हणून हिंदू कुमारिका, महिला हे व्रत श्रद्धापूर्वक करतात. या दिवशी दिवसभर उपवास करतात. काही जणी तर दिवसभरात पाण्याचा थेंबही तोंडात घेत नाहीत.
रात्री १२ वाजता बेलाचे पान चाटून, काही जणी रुईच्या पानावर मध लावून ते पान चाटून, तर कोणी खडीसाखर, केळी यासारखे अगदी थोडेसेच खाऊन उपवास करतात. ज्यांना कडक व्रत करता येत नाही, त्या स्त्रिया उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करतात.
कसं केलं जातं हरतालिका पूजन?
स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवतात. केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करतात. धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पानं व फुलांची पूजा केली जाते. धूप-दीप, निरांजन दाखविला जातो. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात, त्यात जाई, शेवंती, पारिजातक , तुळशी, रुई, शमी, दुर्वा, आघाडा, चाफा, केवडा, डाळिंबाची पानं वाहतात. मनोभावे प्रार्थना करतात. ‘सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे’, अशी प्रार्थना करून आरती केली जाते. या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी, कुमारिका रात्रभर जागरण करतात. झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळतात.
विभाग