हिंदू धर्मात प्रत्येकाच्या घरासमोर तुळशीचे रोप लावलेले दिसते. अनेकांच्या घरासमोर सुंदर असे तुळशी वृंदावन असते. तुळशीच्या झाडाला हिंदू धर्मात प्रचंड महत्व आहे. भगवान विष्णूच्या अत्यंत प्रिय रोपांपैकी एक म्हणून तुळशीला ओळखले जाते. तुळशीचे रोप दारात लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा वास होतो अशी मान्यता आहे. सकाळी उठल्यानंतर स्नान करुन तुळशीसमोर रांगोळी घालून स्त्रिया त्याची पूजा करतात. सांयकाळच्या वेळी तुळशीसमोर दिवा लावून त्याचे पूजन केले जाते. तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. तुळशीच्या पूजनाने घरात लक्ष्मी प्रवेश करते असे म्हटले जाते. त्यामुळे घरात सुखसमृद्धी नांदते.
तुळशीचे वृक्ष धार्मिकरित्या तर महत्वाचे आहेच शिवाय औषधीयदृष्ट्यासुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे अनेकजण तुळशीची पाने पूजेसाठी किंवा औषधांसाठी तोडत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार मात्र तुळशीच्या झाडाची पाने तोडण्याचेसुद्धा काही खास नियम आहेत. जर तुम्ही त्या नियमांचे पालन करत नसाल तर त्याचा नकारात्मक परिणाम थेट तुमच्या आयुष्यावर पडतो. हे नियम नेमके काय आहेत ते आपण जाणून घेऊया.
ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार तुळशीची पाने तोडताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्या लागतात. तुळशीची पाने कधीही नखांनी तोडू नयेत. ही पाने हलक्या हाताने अलगद तोडावीत. शास्त्रानुसार तुळशीची पाने कधीही सांयकाळी किंवा रात्रीच्या वेळी तोडू नयेत. पूजेसाठी तुळशीची पाने सकाळीच तोडून घ्यावीत. शिवाय अंघोळ न करता तुळशीच्या झाडाला हात लावणे वर्ज्य समजले जाते. कारण मान्यतेनुसार तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे नेहमीच पावित्र्य ठेऊन तुळशीला स्पर्श करावा.
ज्योतिष अभ्यासानुसार रविवारी, चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण आणि एकादशी या दिवशी तुळशीची पाने अजिबात तोडू नयेत. शिवाय तुळशीचे रोप घराच्या छतावर कधीही लावू नये. कारण यामुळे घरात कौटुंबिक वादविवाद आणि मतभेद होण्याची दाट शक्यता असते. तसेच तुळशीची पाने तोडण्यापूर्वी हात जोडून देवी लक्ष्मीला नमन करून त्यांची अनुमती घेणे गरजेचे असते. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुळशीच्या रोपामध्ये कोणतेही काटेरी वृक्ष अजिबात लावू नये. कारण असे करणे अशुभ समजले जाते.
तुळशीला ज्याप्रकारे धार्मिक आणि अध्यात्मिक महत्व आहे. त्याचप्रकारे तुळशीला औषधीय महत्वसुद्धा आहे. तुळशी एक औषधीय वनस्पती आहे. सर्दी, खोकला, श्वसनाचे आजार, दातांचे आजार आणि चेहऱ्यासंबंधी तक्रारी या सर्व बाबींमध्ये तुळशी फायदेशीर ठरते. तुळशी विविध रोगांच्या संसर्गापासून बचाव करते. शिवाय रोग प्रतिकारक क्षमता वाढवते. त्यामुळे वैद्यकीय शास्त्रात तुळशीला विशेष महत्व आहे. अनेक औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये तुळशीचा वापर केला जातो.
संबंधित बातम्या