भारतीय संस्कृतीत विवाह या शब्दाला अत्यंत पवित्र स्थान आहे. दोन जीवांचं मिलन असं म्हणण्यापेक्षा दोन घरांचं, त्या घरातील सदस्यांचं मिलन म्हणजे विवाह. भारतात विवाहाच्या परंपरा वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी विवाह सकाळी करणं शुभ मानतात तर काही ठिकाणी विवाह रात्री करणं शुभ मानलं गेलं आहे. मात्र काही प्रथा परंपरा अशा आहेत ज्या ऐकूनच हसावं की रडावं हे कळतच नाही. देशात काही ठिकाणी नवऱ्याचं विचित्र पद्धतीने स्वागत करण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी नवरदेवावर टॉमेटो फेकले जातात तर काही ठिकाणी त्याचे कपडे फाडले जातात. अशाच काही रंजक प्रथा आज आपण पाहाणार आहोत.
सिंधी समाजात ही परंपरा आजही पाळली जाते. सिंधी समाजात या परंपरेला 'सांठ' या नावाने ओळखलं जातं. नवरदेवाच्या उजव्या पायात जोडा घातला जातो, त्यानंतर डोक्याला तेल लावलं जातं, मातीचं भांड नवरदेव आपल्या उजव्या पायाने तोडतो आणि मग नवऱ्याचे कपडे फाडले जातात.
गुजराती लग्नांमध्ये वराचे नाक खेचण्याची अनोखी परंपरा आहे. या परंपरेला 'पोंखना' म्हणतात. वराच्या स्वागतावेळी वधूची आई आरती करते. यानंतर ती वराचे नाक ओढते. वराने नम्र आणि कृतज्ञ राहावे म्हणून ही विलक्षण परंपरा पार पाडली जाते.
बिहारमधील विवाहांमध्ये ही विचित्र परंपरा पाळली जाते. सासरच्या घरी, नववधू मोठ्या टोपलीत पाय ठेवत घरात प्रवेश करते.
मणिपूरमध्ये हा विधी खूप लोकप्रिय आहे. येथील विवाहांमध्ये सर्वात विचित्र विधी म्हणजे मासे पाण्यात टाकणे. असे म्हटले जाते की वधू आणि वर दोन्ही पक्षाच्या स्त्रिया माशांची जोडी पाण्यात टाकतात. ही कृती या कपलचं मजबूत नातं दर्शवते. हे पाण्यात टाकलेले मासे जर जोडीने फिरले जर पती-पत्नी एकत्र आनंदी जीवन जगतील असा त्याचा अर्थ असतो.
हे ऐकून तुम्हाला जरा विचित्र वाटले असेल. मात्र हे खरं आहे. उत्तर प्रदेशातील सरसौल शहरात लग्नादरम्यान वराचे स्वागत गुलाबाच्या पाकळ्यांऐवजी टोमॅटो फेकून केले जाते. लग्न अशा प्रकारे झालं तर पती-पत्नीच्या नात्यात प्रेम टिकून राहतं असा इथला समज आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या