shri krishna janmashtami marathi : येत्या काही दिवसांत भारतासह संपूर्ण जगभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळं अनेकांनी कन्हैयाला प्रसन्न करण्यासाठी व्रत, उपवास, पूजा आणि आरती करण्याचं नियोजन केलं आहे. कृष्ण प्रसन्न झाल्यास आयुष्यात अनेक सकारात्मक गोष्टी घडण्याची शक्यता असते. त्यामुळं श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास ठेवत असताना काही नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक असतं. येत्या सहा सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. त्या दिवशी दुपारी साडेतीन वाजेपासून अष्टमीचा मुहूर्त असणार आहे.
पंचांग शास्त्रानुसार, येत्या सहा सप्टेंबरला सकाली ९ वाजेपासून रोहिणी नक्षत्राला सुरुवात होणार आहे. त्यानंतर सात सप्टेंबरला सकाळी साडेदहा वाजता या नक्षत्राचा शेवट होणार आहे. त्यामुळं भारतासह जगभरात सहा सप्टेंबरच्या रात्रीच कृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तर वैष्णव संप्रदायात सात सप्टेंबरला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. त्यामुळं वेळेनुसार अनेकांनी जन्माष्टमीची तयारी सुरू केली आहे. असंख्य भाविक या दिवशी व्रत किंवा उपवास ठेवणार आहे. आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धीसाठी कृष्णदेवाकडे साकडं घातलं जाणार आहे. परंतु उपवास ठेवत असताना काही गोष्टींची अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे.
जन्माष्टमीला उपवास ठेवताना फलाहार करण्यावर भर द्यायला हवा. भगवान कृष्ण यांच्यावर आधारित असलेली भजनं, गीतं ऐकायला हवीत. दूधापासून तयार झालेले पदार्थ तयार करून त्याला इतरांना वाटायला हवं. गरिब, वंचित आणि गरजूंना पैसे किंवा अन्न दान करायला हवं. तसेच गोमातेला चारा खाऊ घालायला हवा. त्यामुळं आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी निर्माण होण्यास मदत होत असते.
श्रीकृष्ण जन्माष्टमीला सकाळी लवकर उठायला हवं, त्यानंतर अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. घरातील देव्हारा साफ करून त्यात फुलांची माला चढवायला हवी. देव्हाऱ्यातील कृष्णदेवतेच्या मूर्तीला अंघोळ घालावी. त्यानंतर मूर्तीला आकर्षक कपडे घालून श्रृंगार करायला हवं. त्यानंतर कृष्ण मूर्तीला पाळण्यात ठेवावं.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या