Shanishchari Amavasya 2023 : शनिश्चरी अमावस्या कधी? या दिवशी काय करतात?
मराठी बातम्या  /  धर्म  /  Shanishchari Amavasya 2023 : शनिश्चरी अमावस्या कधी? या दिवशी काय करतात?

Shanishchari Amavasya 2023 : शनिश्चरी अमावस्या कधी? या दिवशी काय करतात?

Updated Oct 09, 2023 06:44 PM IST

Shanishchari Amavasya 2023 : शनिश्चरीला विविध धार्मिक विधी पार पाडल्यास व्यक्तीच्या आयुष्यात सुख-समृद्धी येत असते, असं मानलं जातं.

Shanishchari Amavasya 2023
Shanishchari Amavasya 2023 (HT)

Shanishchari Amavasya 2023 Date : सप्टेंबर महिन्यापासून ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत अनेक सण आणि उत्सव साजरे करण्यात येत आहे. २४ सप्टेंबर पासून सुरू झालेलं पितृपक्ष येत्या १४ ऑक्टोबरला संपणार आहे. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी लोक पिंडदान करत असतात. परंतु पितृपक्षातील शनिश्चरी अमावस्येचं धर्मशास्रात फार महत्त्व सांगण्यात आलं आहे. शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी श्राद्ध घातल्यास पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते, तसेच व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक संकटं दूर होतात, अशी मान्यता आहे. त्यामुळं आता शनिश्चरी अमावस्या कधी आहे?, त्याचं काय महत्त्व काय आहे, याबाबत जाणून घेवूयात.

कधी आहे शनिश्चरी अमावस्या?

येत्या १४ ऑक्टोबरला शनिश्चरी अमावस्या साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी शनिश्चरी अमावस्येला सुरुवात होणार असून रात्री उशिरा ११ वाजून १४ मिनिटांनी शनिश्चरी अमावस्येची समाप्ती होणार आहे. त्यामुळं या शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी श्राद्ध आणि पिंडदानाची अनेकांनी तयारी सुरू केली आहे.

शनिश्चरी अमावस्येचं काय आहे महत्त्व?

धार्मिक मान्यतेनुसार, शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी गंगा किंवा पवित्र नदीत अंघोळ केल्यास त्यामुळं व्यक्तीला पुण्य मिळतं, असं मानलं जातं. या दिवशी श्राद्ध, पिंडदान आणि दानधर्म केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत असते. असं केल्याने व्यक्तीच्या पूर्वजांसह शनिदेवही प्रसन्न होतो. त्यामुळं आयुष्यातील संकटं दूर होण्यास मदत होत असते.

शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी काय कराल?

शनिश्चरी अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करायला हवी. तीळ, फुल, तांदूळ आणि साखरेचं मिश्रण पिंपळाच्या झाडाला लावायला हवं. याशिवाय पिंपळाच्या झाडालगत दीप लावून आरती करायला हवी. त्यामुळं शनिदेव प्रसन्न होवून तो आयुष्यातील अडचणी दूर करत असतो. शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाच्या मंत्राचं १०८ वेळा जप केल्यास कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव नाहीसा होत असतो. त्यामुळं शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी या प्रथा आणि विधी पार पाडल्यास त्याचा आयुष्यात मोठा फायदा होतो, असं मानलं जातं.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner