Jaya Kishori motivational thoughts : प्रसिद्ध प्रवचनकार जया किशोरी या सर्वसामान्यांना अध्यात्माशी जोडण्याचं कार्य करतात. त्यांची भजनं आणि प्रवचनं ऐकण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात. विशेषत: तरुणाई त्यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक असते. जया किशोरी यांचे विचार सकारात्मकता वाढवण्यास मदत करतात. छोट्या-छोट्या गोष्टींतून आनंद मिळवण्यास शिकवतात. पाहूया त्यांच्या प्रवचनातून समोर आलेले काही प्रेरक विचार...
'काळानुसार माणसानं बदललं पाहिजे. प्रभू श्रीरामचंद्रांचा काळ वेगळा होता. पण श्रीकृष्णानं अवतार घेतला, तेव्हाचा काळ वेगळा होता. श्रीराम तुम्हाला मर्यादेत कसं कसं राहायचं हे शिकवतात? त्या काळाची ती गरज होती. मात्र श्रीकृष्ण तुम्हाला मर्यादेत कसं ठेवायचं हे शिकवतात. ती त्यांच्या काळाची गरज होती. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास 'तुम्ही चांगले असाल तर मी चांगला आहे, तू वाईट आहेस तर मीही वाईट आहे.'
'पृथ्वी गोल आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्ट फिरून पुन्हा मूळ जागी येते. एक वर्तुळ पूर्ण करते. उदाहरणार्थ, एखाद्याला मदत हवी असेल आणि तो आधार शोधत असेल, मदतीची याचना करत असेल. त्यावेळी नेमके तुम्ही त्याच्या समोर आलात, पण 'मला काय त्याचं?' असं म्हणून निघून गेलात, तर एखाद्या दिवशी तुमच्यावरही ती वेळ येईल. तुम्हालाही एखाद्याच्या आधाराची गरज लागेल. त्यावेळी लोकही तुमच्याकडं दुर्लक्ष करून पुढं जातील.'
'उत्तम गुरू तोच असतो, जो तुम्हाला देवाशी जोडतो. त्यानं अनुयायाला स्वत:शी जोडून घेऊ नये. तसं झालं तर अनेकदा घरात गुरूचा फोटो मोठा होतो आणि देवाचा फोटो लहान होतो. देवाचे फोटो छोटो झाले असतील आणि गुरूची जपमाळ सुरू झाली असेल तर गडबड आहे. असे गुरू योग्य नाहीत असंच म्हणावं लागेल.
'माणसाला आपोआप राग येत नाही, राग आणला जातो. राग सहज येत असता तर तो प्रत्येक ठिकाणी आला असता. पण आपल्याला रागही काळवेळ आणि समोरची व्यक्ती बघून येतो. समोरचा माणूस वरचढ असेल तर राग येत नाही. बॉस ओरडला की आपण त्याच्या कानाखाली मारत नाही. शिवीगाळ करत नाही. का? कारण आपण काही बोललो तर नोकरी जाण्याची भीती असते. मात्र, जेव्हा आपल्यासमोर एखादा कमकुवत माणूस असतो. तो आपलं फार काही बिघडवू शकत नाही हे माहीत असलं की आपण त्याच्यावर सगळा राग काढून टाकतो.'
संबंधित बातम्या