शाकाहारी असूनही पूजा किंवा उपवासात कांदा-लसूण का आहे वर्ज्य? वाचा यामागचं नेमकं कारण
मराठी बातम्या  /  धर्म  /  शाकाहारी असूनही पूजा किंवा उपवासात कांदा-लसूण का आहे वर्ज्य? वाचा यामागचं नेमकं कारण

शाकाहारी असूनही पूजा किंवा उपवासात कांदा-लसूण का आहे वर्ज्य? वाचा यामागचं नेमकं कारण

HT Marathi Desk HT Marathi
Updated Jul 05, 2024 12:46 PM IST

onion garlic prohibited during worship : हिंदू धर्मात पूजा आणि उपवास करताना अनेक शाकाहारी गोष्टीसुद्धा खाण्यास मनाई आहे. प्रामुख्याने पूजापाठ, उपवास यामध्ये मांसाहारी आणि तामसिक पदार्थ वर्ज्य करण्यात आले आहेत.

शाकाहारी असूनही पूजा किंवा उपवासात कांदा-लसूण का आहे वर्ज्य? वाचा यामागचं नेमकं कारण
शाकाहारी असूनही पूजा किंवा उपवासात कांदा-लसूण का आहे वर्ज्य? वाचा यामागचं नेमकं कारण

onion garlic prohibited during worship : हिंदू धर्मात पूजापाठ, उपवास या सर्व गोष्टींना प्रचंड महत्व आहे. या गोष्टींमधून मनुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. परंतु हे सर्व करत असताना अनेक नियमांचे पालन करावे लागते. आपल्या वस्त्रांपासून भोजनापर्यंत सर्वच बाबतीत नियमांचे पालन करावे लागते. भोजनाबाबत सांगायचे झाले तर, निसर्गाने आपल्याला जे काही अन्नपदार्थ दिले आहेत, ते आपण शाकाहाराच्या रूपात खातो. परंतु, हिंदू धर्मात पूजा आणि उपवास करताना अनेक शाकाहारी गोष्टीसुद्धा खाण्यास मनाई आहे. प्रामुख्याने पूजापाठ, उपवास यामध्ये मांसाहारी आणि तामसिक पदार्थ वर्ज्य करण्यात आले आहेत. अशावेळी कांदा-लसूण यांसारखे शाकाहारी पदार्थ का वर्ज्य आहेत असा प्रश्न अनेकांना पडतो. आज आपण त्याबाबतच जाणून घेणार आहोत.

तीन वर्गांमध्ये भोजनाचे विभाजन

वैदिक शास्त्रानुसार, मनुष्याचे भोजन तीन वर्गात विभाजित करण्यात आले आहे. यामध्ये सात्विक, राजसिक आणि तामसिक भोजन असे प्रकार पडतात. प्राचीन काळापासून असे म्हटले जाते की, 'मनुष्य जसे अन्न खातो तसे वर्तन करतो'. अर्थातच आपण खात असलेल्या अन्नाचा परिणाम आपल्या वागण्या, बोलण्यावर होत असतो. त्यामुळेच शास्त्रात सात्विक भोजन खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शिवाय तामसिक भोजन वर्ज्य करण्यास सांगण्यात आले आहे.

सात्विक भोजन

वैदिक शास्त्रानुसार ज्या अन्नात सत्वगुण जास्तीत-जास्त असतात अशा भोजनाला सात्विक भोजन म्हणून संबोधले जाते. दूध, तूप, मैदा, हिरव्या पालेभाज्या, फळे इत्यादी गोष्टींचा समावेश सात्विक भोजनात होतो. या पदार्थांचा भोजनात समावेश केल्याने मन शांत राहते. शरीर निरोगी राहते. आणि आपल्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक पूजेत अथवा उपवासात सात्विक भोजन खाण्याचा सल्ला देण्यात येतो.

राजसिक भोजन

वैदिक शास्त्रानुसार ज्या अन्नपदार्थांमध्ये जास्तीत-जास्त मसाले आणि तेलाचा वापर होतो त्याला राजसिक अन्न म्हणून संबोधले जाते. यामध्ये मटण, चिकन, अंडी, मासा यांसारख्या मांसाहारी पदार्थांचादेखील समावेश केला जातो. हे पदार्थ पचनास जड असतात. शिवाय असे भोजन खाल्याने शरीरात आळशीवृत्ती वाढते. त्यामुळे हिंदू धर्मात शुभ कार्यात असे पदार्थ निषिद्ध मानले जातात.

तामसिक पदार्थ

ज्या पदार्थांमुळे रक्त प्रवाह वाढतो किंवा कमी होतो अशा पदार्थांना तामसिक पदार्थ म्हटले जाते. असे पदार्थ सेवन केल्याने मनुष्यात राग, अहंकार, चिडचिडपणा आणि द्वेष यांसारखे भाव वाढतात. त्यामुळे हिंदू धर्मात पूजापाठ आणि उपसावात असे पदार्थ निषिद्ध मानले जातात. विशेष म्हणजे कांदा आणि लसूण या पदार्थांचा समावेश तामसिक पदार्थांमध्ये होतो. त्यामुळेच शाकाहारी असूनसुद्धा कांदा आणि लसूण हे पूजापाठ आणि उपवासात वर्ज्य केले जातात.

Whats_app_banner