आपण आपल्या शेतामध्ये, घराच्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या वृक्षांची लागवड करत असतो. अनेकांना घरासमोर छोटी-मोठी झाडे लावण्याची आवड असते. यामध्ये काही वृक्ष हिंदू शास्त्रानुसार घरासमोर लावणे अशुभ असतात. तर काही वृक्ष घरासमोर, अंगणात लावणे अतिशय शुभ असते. आज आपण अशाच एका वृक्षाबाबत जाणून घेणार आहे, जो घरासमोर, दारात लावणे अत्यंत शुभ आहे. शिवाय या झाडामध्ये औषधीय गुणसुद्धा आहेत. या झाडाचे धार्मिक आणि औषधीय गुणधर्म पाहून प्रत्येकाने हे झाड आपल्या अंगणात लावल्यास विशेष लाभ मिळेल.
हिंदू धर्मात वृक्षांना अध्यात्मिक महत्व आहे. धर्मानुसार काही ठराविक वृक्षांमध्ये देवी-देवतांचा वास असल्याची मान्यता आहे. त्यानुसारच हिंदू धर्मात आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. शास्त्रानुसार आवळ्याच्या वृक्षात भगवान विष्णूचा वास असतो. आवळ्याच्या झाडामुळे घरात सुखसमृद्धी येते. वास्तूशास्त्रानुसार, घरासमोर आवळ्याचे झाड असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा येते.
आवळ्याच्या झाडाला केवळ फळच येत नाही तर ते अनेक पोषक तत्वांनीयुक्त औषधीदेखील आहे. आवळ्याच्या झाडाला प्रचंड मोठे धार्मिक महत्त्वही आहे. शास्त्रानुसार असे मानले जाते की,आयुष्यातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी हे झाड खूप उपयुक्त आहे. बहुतांश लोकांच्या घराच्या अंगणात हे झाड आवर्जून पाहायला मिळते. मात्र राजस्थानमधील जयपूरच्या ग्रामीण भागात आवळ्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. विशेषतः चौमू आणि मुहाना मंडी ही ठिकाणे आवळ्याच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहेत.
हिंदू धर्मात एकादशीला प्रचंड महत्व आहे. एकादशी हा सण भगवान विष्णूला समर्पित आहे. एकादशी तिथी भगवान विष्णूसाठी अत्यंत प्रिय तिथी आहे. आणि आवळ्याच्या झाडावर भगवान विष्णूचा वास असतो. त्यामुळेच शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी आवळ्याचे झाड लावणे अत्यंत शुभ आणि लाभदायक समजले जाते. शिवाय एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाला सात वेळा धागा बांधल्याने विष्णू देव प्रसन्न होतात. आणि त्या व्यक्तीच्या सर्व अडचणी दूर होतात. त्यामुळेच अनेक लोक आवळ्याच्या झाडाचे पूजन करतात.
आवळ्याच्या वापराने केसांसंबंधित अनेक समस्या दूर होतात. आवळा, रिठा, शिकेकाई यांच्या मिश्रणाने केस मजबूत होतात. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. त्यामुळेच आवळ्याचे नियमित सेवन केल्याने डोळ्याच्या अनेक समस्या दूर होतात. आपली दृष्टी निरोगी राहते. शिवाय आवळा चूर्ण गरम पाण्यातून सेवन केल्याने पोटासंबंधी तक्रारी दूर होतात. बद्धकोष्ठतापासून आराम मिळतो. त्यासोबतच मूळव्याधमध्येसुद्धा आवळा चूर्ण अत्यंत फायदेशीर ठरते. अशाप्रकारे आवळ्याचे एक ना अनेक फायदे आहेत.
संबंधित बातम्या