छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी ऐतिहासिक वाघनखं साताऱ्यात दाखल झाली असून आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचा अनावरण सोहळा पार पडला. शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या गनिमी युद्धात ही वाघनखं वापरली होती. ती वाघनखं आज अखेर तमाम जनता-शिवप्रेमींना पाहण्यासाठी खुली झाली आहेत.
लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात असलेली वाघनखं महाराष्ट्रात आणण्यात आली आहेत. ही वाघनखं शिवाजी महाराजांची असल्याचा दावा राज्य सरकारद्वारे करण्यात आला आहे. मात्र, काही इतिहास तज्ज्ञांसह विरोधकांनी या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
आज या ऐतिहासिक वाघनखांसह ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाने प्रकाशित केलेल्या 'शिवशौर्यगाथा' या विशेष पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच भारतीय डाक विभागाच्या वतीने किल्ले रायगड, किल्ले सिंधुदुर्ग, शिवछत्रपतींची राजमुद्रा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम अशी भक्ती आणि शक्तीचा सुरेख संगम असलेल्या विशेष टपाल तिकिटांचे अनावरण करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री आणि नेते उपस्थित होते.
तीन वर्षांसाठी ही वाघनखं आणली असून त्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज १९ जुलैपासून सातारा येथील संग्रहालयात प्रदर्शनासाठी ती ठेवण्यात येणार आहेत, त्यानंतर मुंबई, नागपूर, कोल्हापूर येथील संग्रहालयातील इतिहास प्रेमींना ती पाहण्याची संधी मिळणार आहे. असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलंय. ही वाघनखं राज्यातील चार संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नागपूरमधील सेंट्रल म्युझियम, कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये ही वाघनखं ठेवण्यात येणार आहे. ही वाघनखं लंडनहून आणण्यासाठी जाण्याचा आणि येण्याचा खर्च केवळ १४ लाख ८ हजार रुपये असून अधिवेशनाच्या एका दिवसाच्या खर्चाहून कमी असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले होते.
हा शिवरायांच्या शौर्याचा अपमान : मुख्यमंत्री म्हणाले की, काही लोक या वाघनखांवर शंका उपस्थित करत आहेत. हे आपलं दुर्दैवं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, ती वाघनखं येत आहेत, हे ऐकून प्रत्येकाला अभिमान वाटला आहे. परंतू काही लोकांना फक्त राजकारण करायचं आहे. चांगल्या कामांना गालबोट लावायचा त्यांचा प्रयत्न आहे. पण वाघनखांवर आक्षेप घेणं म्हणजे, हा शिवरायांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा अपमान आहे.
जी वाघनख अनेक वर्ष लंडनच्या म्युझियममध्ये होती ती आता भारतात आली आहेत. आपल्या देशात काही लोकांना वाद निर्माण करण्याचा एकमेव धंदा आहे. हा रोग आजचा नाही त्यांचा सामना छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील करावा लागला. काहींच्या मेंदूत बुरशी आली असून त्यांची बुरशी काढण्याचे काम करा, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी विरोधकांना लगावला.